आजकाल वजन वाढणे ही मोठी समस्याच बनली आहे. आपल्याला झेपेल तेवढेच खाणे आणि योग्य मार्गाने ते पचविणे जर जमत नसेल, तर त्याचा परिणाम अवाजवी वजनवाढीत होतो. अलीकडे नवी खाद्यसंस्कृती उदयास आल्यापासून वजनवाढीची समस्याही झपाटय़ाने फोफावलेली दिसते. असे खाद्य भरमसाट खात राहिले तरी त्याने पोट भरत नाही आणि पोट भरेपर्यंत खाल्ले की शरीर हवा भरलेल्या फुग्यासारखे वाढू लागते. खाण्याच्या नादात वजन वाढण्याच्या समस्येचे हे कारण अगोदर लक्षातच येत नाही. अचानक काही तरी घडते व वजन वाढल्याची जाणीव होते. ही झाली सर्वसामान्यांची समस्या; पण काहींची समस्या वेगळीच असते. काहींचे वजन अचानक घटते आणि गमावलेले वजन पुन्हा मिळविण्याचा खटाटोप सुरू होतो. कसेही करून वजन वाढविले नाही तर कुणीच आपल्याला विचारणार नाही आणि बेदखल अवस्थेत आपला टिकावदेखील लागणार नाही या चिंतेपोटी वजन वाढविण्याची धडपड सुरू होते आणि अखेर हवा भरलेल्या फुग्याचे टम्म सौंदर्य प्राप्त होते. जमिनीवर असूनही पाय जमिनीला लागतच नाहीत; पण अशा वजनदारांना तरंगत ठेवण्यासाठी तोलवून धरण्याची हवेची क्षमतादेखील कधीकधी संपून जाते आणि वजन कमी करा, असा इशारा देणारे प्रसंग घडतात. काही जणांचे स्वत:चे वजन कमी असते; पण ते आपल्यासोबतच्या सामानाचे वजन मात्र वाढवतच जातात. कधी तरी हवेत झेपावताना सोबतचे क्षमतेपेक्षा जास्त वजन असलेले सामान निमूटपणे उतरवून ठेवण्याची वेळ येते, तेव्हा आपल्याहून आपल्यासोबतच्या सामानाचेच वजन अधिक असल्याचा साक्षात्कार त्यांना होतो. अशा वेळी, ज्या हवेत तरंगायचे असते, त्या हवेस पेलवेल एवढेच सामान सोबत ठेवणे भाग पडते, अन्यथा मुकाटपणे जमिनीवर उतरावेच लागते. आपल्यासोबत क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे सामान बाळगणाऱ्यांना अधूनमधून हा धडा मिळत असला, तरी अशाच सवयी असलेल्या प्रत्येकास या धडय़ापासून बोध मिळतोच असे नाही, कारण क्षमतेहून अधिक वजनाचे सामान बाळगण्याचा हव्यास! काही जण स्वत:पेक्षा स्वत:सोबतच्या सामानाचेच वजन वाढविण्याचा खटाटोप सतत करत राहतात आणि जेव्हा हवेत झेप घ्यायची वेळ येते, तेव्हा या क्षमतेहून अधिक वजनाच्या सामानापायी त्यांचे पाय कायम जमिनीवरच राहतात. तरीही त्यांना त्याची जाणीव होतच नाही. मग ते काल्पनिकरीत्या हवेत तरंगू लागतात. सोबतच्या सामानामुळे वाढलेल्या वजनाच्या भरवशावरच एक ना एक दिवस आपलेही विमान हवेत तरंगेल असे बेहिशेबी स्वप्न पाहात न झेपणारे ते अवजड सामान कुरवाळतच बसतात; पण अतिरिक्त वजनामुळे विमान असो वा हेलिकॉप्टर, हवेत उडतच नाही. हवेत झेपावल्याखेरीज आपल्या किंवा आपल्यासोबतच्या वजनाचा अंदाज येतच नसल्याने, हवेत तरंगणाऱ्यांनी आपले वजन आटोक्यातच ठेवणे हेच चांगले. नसत्या स्वाभिमानापोटी, वजनाचे हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही.