भारताच्या एकूण अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीपैकी ६ ते ७ टक्के वाटा (७५० जिल्ह्यांपैकी) फक्त एका पुणे जिल्ह्याचा आहे. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीचा ३३ टक्के वाटा एकटय़ा पुण्याने उचलला आहे. या योगदानामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीत पुणे जिल्हा भारतात सर्वप्रथम आहे. ही बाब पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. पुण्याचे अभियांत्रिकी निर्यातीत वर्चस्व आहे. डॉ. सुधीर हसमनीस  देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे  मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे  – बा. भ. बोरकर

कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या या मधुर ओळी पुणे जिल्ह्यातील उद्योगांना आणि कामगारांना अचूक लागू पडतात. ओसाड आणि पडीक जमिनीवर उभ्या असलेल्या औद्योगिक आस्थापनांना त्यांनी जे आज रूप दिले आहे त्या या ओळींमध्ये बरोबर व्यक्त होते.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील एकमेव मुख्य भाषा आहे. सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराला एक वेगळी ओळख आहे. आजकालच्या काळात पुण्याला आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. पण पुणे हे खऱ्याखुऱ्या अर्थी सर्व प्रकारच्या वाहन उद्योगाचे हृदय म्हणून मानले जाते. गेल्या काही दशकांत वाहन उद्योगाची मोठय़ा प्रमाणात वाढ इथे झाली आहे. कार, ट्रक, जीप, बाइक्स, महागडय़ा कार्स, ट्रॅक्टर्स इत्यादी प्रकारची वाहने पुणे येथे बनतात. भारतामध्ये तीन उद्योग महत्त्वाचे मानले जातात, त्यात स्टील, सिमेंट आणि वाहन उद्योग यांचा समावेश आहे. या उद्योगामधून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होतो आणि अर्थकारण चालते. वाहन उद्योग हा भारताच्या आर्थिक वृद्धीला चालना देणारा प्रेरक घटक मानला  जातो. 

वाहन निर्मितीमध्ये भारत जगात ६ वा, ट्रॅक्टर्स निर्मितीमध्ये सर्वात मोठा, दुचाकीमध्ये दुसरा, तसेच कार्समध्ये दुसरा आणि व्यापारी वाहनामध्ये ८ वा आहे. या मध्ये महाराष्ट्राचा व पुणे जिल्ह्याचा खूप मोठा वाटा आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास सुमारे ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाहने पुणे येथे बनतात. त्यामुळेच की काय आता पुण्याला भारताचे डेट्रॉइट म्हणाले जाते. पुणे हे भारतातील सर्वात मोठे वाहन निर्मिती केंद्र आहे. एकटय़ा पिंपरी-चिंचवड क्षेत्रामध्येच १२,००० हून अधिक उत्पादन उद्योग व उत्पादन सहायक उद्योग आहेत. 

१९५० च्या दशकात टाटा मोटर्सने (त्या वेळची टेल्को) चिंचवडचा एक जुना कारखाना विकत घेऊन वाहन उद्योगाची पायाभरणी केली. इन्व्हेस्टा मशीन टूल्स ही १९४२ ला स्थापन झालेली संस्था टेल्कोने त्या वेळी विकत घेतली आणि आपले काम सुरू केले. त्या कंपनी मधील सर्व कामगारांना टेल्कोमध्ये नोकरी देण्यात आली होती. अत्यंत ओसाड जमिनीचा कायापालट करत पिंपरी आणि चिंचवड येथे वाहन कारखाने उभे केले. त्या काळात परमिट राज होते. परदेशातून काही यंत्रे वगैरे आणायची असल्यास लायसन्स लागायचे. परकी चलनाचा तुटवडा असल्यामुळे समस्या असायची. प्रशिक्षित मनुष्य बळ नव्हते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे १९५० च्या दशकात सप्लायर किंवा वेंडर्स अशी पूर्ण संकल्पना नव्हतीच. सर्वात प्रथम टेल्कोने पुणे, महाराष्ट्र आणि मग अख्ख्या भारतात यंत्रे आणि वाहनाचे घटक बनवण्यासाठी असे सप्लायर किंवा वेंडर्स तयार करायला सुरुवात केली. त्यांना माहिती देणे, आर्थिक मदत देणे, त्यांच्यासाठी बँकेकडे तारण राहणे, त्यांना प्रशिक्षण देणे, गुणवत्ता वाढीसाठी प्रवृत्त करणे. बघता बघता पुढच्या दोन दशकांमध्ये सप्लायर किंवा वेंडर्सचा एक मोठा गट निर्माण झाला. टेल्कोला तर त्याचा फायदा झालाच पण त्या नंतर येणाऱ्या प्रत्येक नवीन वाहन निर्मात्याला याचा लाभ झाला.

या नंतर मोठे काम टेल्कोने केले ते म्हणजे स्वत:ची ट्रेनिंग डिव्हिजन उभी केली आणि त्यामध्ये फुल टर्म अप्रेन्टिस (एफटीए) आणि व्यवस्थापकीय प्रशिक्षण केंद्र सुरू केले. याचा फायदा असा झाला की कारखान्यांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार झाले जे मुळातच उपलब्ध नव्हते. दहावी पास विद्यार्थ्यांना घेऊन पूर्ण ३ वर्षे प्रशिक्षित करून त्या वेळच्या टेल्कोमध्ये कामावर घेतले जात असे. जेवण व राहण्याची सोय, टाटासारख्या उद्योजकांकडे काम करण्याची संधी, अत्यंत चांगल्या सवलती, यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना या फुल टर्म अप्रेन्टिस (एफटीए) योजनेमध्ये दाखल केले. आणि या मुलांचे पुढे आयुष्याचे कल्याण झाले. टेल्कोच्या या पुढाकारामुळे एक औद्योगिक लाट पुणे शहर आणि जिल्ह्यात आली.

त्या काळात आयटीआय संस्था अस्तित्वात आल्या नव्हत्या. १९९२ ला पुण्यात आयटीआय संस्था सुरू झाली. तंत्र प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नव्हत्याच. त्यामुळे टेल्कोने सुरू केलेल्या या फुल टर्म अप्रेन्टिस (एफटीए) उपक्रमाचा टेल्कोला तर फायदा झालाच पण कुठल्या का कारणाने त्या प्रशिक्षणार्थीला जर टेल्कोमध्ये नोकरी मिळाली नसेल तरी आजूबाजूच्या घटक बनवणाऱ्या कारखान्यांना या प्रशिक्षित मनुष्यबळाचा फायदा झाला. दरवर्षी अंदाजे ३०० प्रशिक्षणार्थी इथे दाखल होत असत. आता सरकारी आणि खासगी आयटीआय संस्था उपलब्ध आहेत.

गमतीची गोष्ट अशी की, लायसन्स राज, यंत्रांची अनुलपब्धता, वाहन बनवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व प्रोसेस लाइन्स यांचा अभाव, असे सारे गृहीत धरता टेल्कोने पहिला ट्रक १९७७ च्या जुलैमध्ये आपल्या असेम्ब्ली लाइनवरून काढला. म्हणजे जवळजवळ १७ वर्षे मनुष्यबळ, संसाधने, इतर तयारी आदी जमवण्यात गेली. पण या कालावधीचा फायदा आजूबाजूच्या औद्योगिक परिसराला खूप झाला.

स्वर्गीय मुळगावकर प्रमुख असताना टेल्कोचा जणू काही असा अलिखित नियम होता, की प्रत्येक ट्रकमागे एक कर्मचारी अशी मनुष्यबळ संख्या (पान २ वर) (पान १ वरून)

असावी. म्हणजे १२,००० ट्रक जर बनवायचे असतील, तर तुमच्याकडे निदान १२,००० कर्मचारी काम करायला हवेत. त्यानुसार भरती होत असे.  

जेव्हा मुंबई-पुणे सारखे एक्सप्रेस वे बनायला लागले, तेव्हा असा एक अभ्यास  झाला होता, की टेल्कोच्या एका ट्रकमागे निदान १६ लोकांना रोजगार मिळतो. त्यात ड्राइवर, क्लीनर, हमाल, ढाब्यावरचे लोक, पंक्चर काढणारे, देखभाल करणारे, असे अनेक जण सामील होते. आजमितीला टेल्कोने म्हणजे टाटा मोटर्सने निदान ५० लाख वाहने तरी विकली असतील त्याला जर या १६ च्या संख्येने गुणले तर तितके रोजगार एकटय़ा टेल्कोने निर्माण केले. हा निकष इतर ट्रक उत्पादकांना पण लावता येईल. 

नोव्हेंबर १९४५ ला बचराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड या नावाखाली एक कंपनी सुरू झाली आणि ती पुढे बजाज ऑटो नावाने प्रसिद्ध झाली. १९५९ ला बजाजला दुचाकी आणि तीनचाकी वाहने बनवण्याचा परवाना भारत सरकारकडून मिळाला. त्या वेळेला पियाजिओकडून त्यांना तंत्रज्ञान मिळाले होते.

बजाज ऑटो लिमिटेड भारतीय दुचाकी कंपनी आहे. ही कंपनी जगभर दुचाकी आणि तीन चाकी वाहने विकते. या कंपनीचे तीन चाकी गाडय़ांचा कारखाना पुणे येथे स्थित आहे. ही कंपनी मोटारसायकली, स्कूटर आणि ऑटो रिक्षा तयार करते. बजाज ऑटो हा बजाज ग्रुपचा एक भाग आहे. राजस्थानात जमनालाल बजाज यांनी १९४० च्या दशकात याची स्थापना केली होती. हे पुणे, महाराष्ट्रात असून, चाकण (पुणे), वाळूज (औरंगाबादजवळ) आणि उत्तराखंडमधील पंतनगर येथे कारखाने आहेत. आकुर्डी (पुणे) येथील सर्वात जुना कारखाना आणि आर अँड डी सेंटर आहे. बजाज ऑटो ही मोटारसायकली बनविणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. ही जगातील सर्वात मोठी तीन चाकी वाहन निर्माता कंपनी आहे.

सध्या ऑटो मार्केटमध्ये अनेक देशविदेशी ऑटो कंपनीचा बोलबाला आहे. परंतु, कधीकाळी देशातील अनेकांच्या मुखात एकच वाक्य असायचं ते म्हणजे ‘हमारा बजाज’. त्या काळी स्कूटरला मोठी मागणी होती. बजाजची स्कूटर ही ब्रँड समजली जात असत. नंतर भारतात उदारीकरणाला सुरुवात झाली. भारतात खुल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. जपानी मोटरसायकल कंपन्या भारतात आल्याने भारतातील ऑटो कंपन्यांना जोरदार टक्कर मिळाली. अशावेळी राहुल बजाज यांनी कंपनीचे सूत्रे हाती घेत आपला व्यवसाय सुरू ठेवला. बजाज समूहातील अव्वल कंपनी बजाज ऑटोचा व्यापार ७.२ कोटी रुपये होता. तो आज १२,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

राहुल बजाज हे १९७२ पासून ऑटो बजाज आणि पाच दशकांपर्यंत बजाज ग्रुप ऑफ कंपनीजशी जोडले गेले होते. त्या काळी हमारा बजाज ही केवळ ऑटोमोबाइल नाही तर प्रत्येक वस्तूंच्या मार्केटिंगसाठी बेंचमार्क समजली जात होती. बजाज चेतकची इतकी मागणी वाढली की, एक वर्षांपर्यंत वेटिंग पीरियड होता. बजाज चेतक स्कूटरच खरेदी करायची असा अनेकांचा अट्टाहास असायचा. बजाज ऑटो लिमिटेडचे पुण्यातील आकुर्डी, चाकण, औरंगाबादजवळील वाळूज येथे बजाज बाइक्स आणि ऑटो तयार करण्याचा प्लांट आहे. राहुल बजाज यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजीव बजाज यांनी डायरेक्टर पदाची सूत्रे सांभाळली. ३५ वर्षांच्या यशस्वी घौडदोडीनंतर बजाज चेतकचे उत्पादन थांबवण्यात आले. आज पल्सर, डिस्कवर, प्लॅटिना यांसारख्या बाइक्सचे प्रॉडक्ट मोठय़ा प्रमाणात असून ग्राहकांचा याला मोठा प्रतिसाद मिळतोय. बजाज पल्सर, ऑटो, टेम्पो, मिनीबसचेही प्रॉडक्ट बजाजकडून केले जाते.

बजाजने पण पुणे आणि चाकण येथे मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण केला. टेल्कोप्रमाणे त्यांनी पण स्वत:चे आर अँड डी केंद्र उभे केले. स्वत:चे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण केले. आजमितीला त्यांच्याकडे १०,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.

फोर्स मोटर्स लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनी आहे, जी पुण्यात आहे आणि डॉ. अभय फिरोदिया समूहाची प्रमुख कंपनी आहे. १९५८ पासून २००५ पर्यंत, कंपनी बजाज टेम्पो मोटर्स म्हणून ओळखली जात होती कारण तिचा उगम बचराज ट्रेडिंग लिमिटेड आणि जर्मनीच्या टेम्पो यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून झाला होता. कंपनी टेम्पो, मॅटाडोर, मिनीडोर आणि ट्रॅव्हलरसारख्या ब्रँडसाठी ओळखली जाते. गेल्या पाच दशकांमध्ये, त्याने डेमलर,  ZF , बॉश,  VW,  Traton आणि  MAN सारख्या जागतिक उत्पादकांशी भागीदारी केली आहे. फोर्स मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्हॅन उत्पादक कंपनी आहे. कंपनी संपूर्ण उत्पादन श्रेणीसाठी स्वत:चे घटक बनवून, पूर्णपणे स्वावलंबी आहे.

हलकी वाहतूक वाहने बनवण्याव्यतिरिक्त, फोर्स मोटर्स इंजिन आणि एक्सेल तसेच डाय-कास्ट अ‍ॅल्युमिनियमचे अनेक भाग बनवतात. बजाज टेम्पोचा पाया १९४५ मध्ये स्थापन झालेल्या बच्छराज ट्रेडिंग कंपनीपासून सुरू झाला. बच्छराजने १९५१ मध्ये जर्मनीच्या परवान्यानुसार तीन चाकी टेम्पो, ऑटो रिक्षा आणि छोटे ट्रक जुळणी करण्यास सुरुवात केली. १९५८ मध्ये कंपन्यांनी बजाज टेम्पो मोटर्स नावाचा संयुक्त उपक्रम तयार करण्याची घोषणा केली, ज्याचे २६ टक्के समभाग टेम्पोचे होते. १९६८ मध्ये फिरोदिया ग्रुपने बजाज टेम्पोमध्ये बहुसंख्य हिस्सा घेतला.

१९७१ मध्ये टेम्पो (जर्मनी) डेमलर-बेंझच्या हातात गेला, ज्याने २००१ पर्यंत बजाज टेम्पोमध्ये १६.८ टक्के हिस्सा राखून ठेवला. डेमलरने ४३ वर्षांनंतर एप्रिल २००१ मध्ये दोन कंपन्यांमधील ताळमेळ लक्षात घेऊन आपला हिस्सा विकला. टेम्पो मॅटाडोर हे भारतातील पहिले डिझेल लाइट व्यावसायिक वाहन होते. कंपनीने १९५८ मध्ये विडाल आणि सोहन टेम्पो वर्के जर्मनीच्या सहकार्याने हॅन्सेट 3-व्हीलरचे उत्पादन सुरू केले. टेम्पो हा शब्द आता भारतातील सर्वमान्य शब्द आहे.

फोर्स मोटर्स लहान व्यावसायिक वाहने (SCV), हलकी व्यावसायिक वाहने (LCV), मल्टी युटिलिटी व्हेइकल्स (MUV)), स्पेशल क्रॉस कंट्री व्हेइकल्स आणि कृषी ट्रॅक्टर्ससह वाहनांची श्रेणी तयार करते. पाच हजारपेक्षा जास्त कर्मचारी आजच्या घडीला इथे काम करतात.

कायनेटिक इंजिनीरिंग कंपनीने पण एक काळ गाजवला. अनेक लोकांना रोजगार तर दिलाच पण स्वस्त आणि मस्त अशी वाहने पण दिले. त्यामुळे अनेक छोटे व्यावसायिक त्यामुळे आपला धंदा वाढवू शकले. टॅको ग्रुप ऑफ कंपनीज, भारत फोर्ज अशा अनेक वाहनांसाठी लागणारे घटक बनवणाऱ्या कंपन्या अस्तित्वात आल्या. त्यांनी वाहन उद्योगाला मजबुती तर दिलीच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोजगार निर्मिती केली.

मिहद्रा ग्रुपच्या पुणे, चाकण, तळेगाव परिसरातील संस्था, फियाट रांजणगाव, जीपचा चाकण प्लांट यांनी पुणे शहराची व जिल्ह्याची शान वाढवली आणि अनेक प्रकारची वाहने निर्माण करताना आपल्या मनुष्यबळाला प्रशिक्षण तर दिलेच पण मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध केला. 

गेल्या दोन दशकांमध्ये पुण्यातील पिंपरी-चिंचवड, चाकण-तळेगाव आणि रांजणगाव औद्योगिक क्षेत्र देशातील सर्वात मोठे ऑटोमोबाइल हब बनले आहे. वेस्टर्न क्लस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, या पट्टय़ाचा बाजारातील अंदाजे ३३ टक्के वाटा आहे, असे एका सेक्टर अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्राच्या गुंतवणुकीला अनुकूल उपक्रम आणि औद्योगिक राज्य म्हणून त्याची प्रतिष्ठा यामुळे टाटा मोटर्स, बजाज ऑटो आणि मिहद्रा अँड मिहद्र यांसारख्या आघाडीच्या ऑटोमोबाइल ब्रँडची या पट्टय़ात प्लांट्स असल्याचे सुनिश्चित झाले. जीएम, मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेही या प्रदेशात मोठय़ा सुविधा आहेत. अग्रगण्य  डएट च्या उपस्थितीने सहायक विक्रेत्यांना दुकान सुरू करण्यास प्रोत्साहित केले. त्यातील बरेचसे काम लहान युनिट्सना उप-करार देण्यात आले होते, ज्यामुळे जवळजवळ २० वर्षे भरभराट झालेली एक प्रचंड परिसंस्था निर्माण झाली होती. राज्यात सहज उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ उद्योगासाठी आकर्षक होते. लाखो लोकांना रोजगार मिळाला.

ऑटोमोबाइल उत्पादक कंपन्या,  डएट मिळून ३० लाखांहून (संघटित व असंघटित धरून) अधिक रोजगार निर्माण केला आहे आणि या छोटय़ा आणि मध्यम कंपन्यांचा विचार केला तर त्यांच्याद्वारे आणखी ७ ते ८ लाख रोजगार निर्माण झाले आहेत. या व्यतिरिक्त वाहनांची सेवा आणि दुरुस्ती अधिकृत आणि छोटी गॅरेजस, स्पेअर पार्ट्स विक्री केंद्रे, रस्त्याच्या कडेला देखभाल सेवा, कार क्लीनर यांनी पुणे जिल्ह्यात आणि आसपास १० लाखांहून अधिक रोजगार निर्माण केला आहे. 

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर, राज्य सरकारने १९६२ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (टकऊउ) ची स्थापना केली ज्यामुळे राज्यातील इतर क्षेत्रांमध्ये वाढ झाली. त्याच्या स्थापनेपासूनच्या दशकांमध्ये,  टकऊउ ने महाराष्ट्र सरकारची प्राथमिक औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून काम केले आहे. त्याच्या स्थापनेपासून,  MIDC ने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी औद्योगिक क्षेत्र स्थापन केले आहे. या मध्ये सर्वात जास्त औद्योगिक वाढ असलेले क्षेत्र म्हणजे पुणे महानगर येते. राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात २०% योगदान देणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात औद्योगिक राज्य आहे.  GSDP  च्या जवळपास ४६% उद्योगांचे योगदान आहे.

भारतातील सर्वात मोठय़ा शहरांपैकी एक आणि अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे असलेले शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून, पुणे हे आयटी आणि उत्पादनासाठी एक प्रमुख स्थान म्हणून उदयास आले आहे. पुण्याची आठव्या क्रमांकाची महानगरीय अर्थव्यवस्था आहे आणि देशातील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न आहे.

हा पूर्ण आलेख पाहताना आपल्याला निश्चित जाणवेल, की पुण्याच्या भरभराटीमध्ये वाहन उद्योगाने आणि त्याच्याशी निगडित व्यवसायांनी किती मोठा वाट उचलला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये वाहन उद्योगाने वैभव तर आणलेच पण त्या सोबत इतर उद्योगांना पण उभे राहण्याचे बळ दिले. टाटा, बजाज, फिरोदिया, प्रीमियर अशा जुन्या संस्थांचे पुणे कायमच ऋणी  राहील.

(लेखक टाटा मोटर्सचे निवृत्त सहमहाव्यवस्थापक आणि व्यवस्थापनतज्ज्ञ असून या विषयाचे अध्यापन ते विविध शिक्षणसंस्थांमध्ये करतात.)

पुण्यातील वाहन उद्योगाशी संबंधित तीन महत्त्वाच्या संस्था.

ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे – संशोधन व विकास, चाचणी व प्रमाण संस्था

ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिटय़ूट, पुणे – ओईएमसाठी एमएसएमई विकास

होरिबा इंडिया टेक्निकल सेंटर, पुणे – उत्सर्जन मापन यंत्रणा व आधुनिक निर्देशक उपकरणे

मधल्या साथीच्या काळात सर्वच उद्योगांना एक धक्का मिळाला, मोठे नुकसान झाले, काही जणांच्या नोकऱ्या गेल्या, काही संस्था बंद पण पडल्या, परंतु या वाहन उद्योगाने परत भरारी घेतली आहे आणि विक्रमी उत्पादन सुरू केले आहे.