सध्याच्या इंटरनेट युगात बँकिंगची प्रक्रिया अतिशय सुलभ व जलद झाली आहे. आपल्याला हव्या त्या ठिकाणाहून पैसे काढता येतात. नेटबँकिंगच्या मदतीने घरबसल्या बँकेचे व्यवहार करता येतात. या सुविधेमुळे ‘इंटरनेट बँकिंग’च्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी मोबाइलची बिले भरण्यापासून मित्राला पैसे पाठवण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी आपण या माध्यमातून करतो. परंतु, त्याच वेळी वापरकर्त्यांची थोडीशी निष्काळजी सायबर चोरांच्या पथ्यावर पडते व ‘हॅकिंग’च्या माध्यमातून संबंधित वापरकर्त्यांची आर्थिक लूट केली जाते.

भारतात ‘सीईआरटी’ ही एजन्सी ‘हॅकिंग’, ‘फिशिंग’ यांसारख्या प्रकारांना आळा घालण्याचे काम करते. सायबर सुरक्षेसाठी भारतीय संगणक आणीबाणी प्रतिसाद पथकाने (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम-सीईआरटी-इन)  मलेशियातील सायबर सिक्युरिटी संस्था, सिंगापूरमधील ‘सिंगापूर कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (सिंग-सीईआरटी) आणि जपानमधील ‘जपान कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम को ऑर्डिनेशन सेंटर’शी करार केला आहे. या माध्यमातून सर्व संबंधित संस्था संवेदनशील माहितीची देवाणघेवाण करून परस्परांच्या देशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी किंवा अशी फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी मदत करत असतात. याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या गतवर्षीच्या संयुक्त चर्चेतही सायबर सुरक्षेबाबतचा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला होता.

परंतु, या झाल्या सरकारी पातळीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना. सायबर सुरक्षेसाठीच्या उपायांमध्ये वारंवार सुधारणा होत असल्या तरी, सायबर गुन्हेगार या सुधारणांना बगल देत वा त्या मोडून काढत सर्वसामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतातच. दोन वर्षांपूर्वी ‘क्रायडेक्स’ नावाच्या अशाच एका व्हायरसने विविध बँका व सोशल नेटवर्किंग साइटवर हल्ला केला होता. ई-बँकिंगची माहिती चोरणारा हा ‘ट्रॉजन’ अगदी पेन ड्राइव्हनेही पसरत होता. या माध्यमातून तो वापरकर्त्यांची गोपनीय माहिती चोरून हॅकपर्यंत पोहोचवत होता.

काही महिन्यांपूर्वीच जगभरातील अनेक देशांमध्ये ‘रॅन्समवेअर व्हायरस’ने खळबळ उडवून दिली होती. सरकारी, खासगी कंपन्या, बँका, रुग्णालये, बंदरे यांना लक्ष्य करत या ‘व्हायरस’च्या निर्मात्यांनी सर्व काही पूर्ववत करण्यासाठी चक्क खंडणी वसूल केली. संगणकतज्ज्ञांच्या दक्षतेमुळे भारतात हा व्हायरस जास्त पसरू शकलेला नाही. मात्र या व्हायरसचे निर्माते सायबर हल्लेखोर पुन्हा एकदा हल्ला करू शकतात. त्यामुळे वापरकर्त्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

काय काळजी घ्याल?

* बहुतेक गुन्हे पासवर्ड आणि लॉगइन माहिती चोरून केले जातात. आपल्या नकळत ही माहिती आपल्या संगणकातून चोरली जाऊ शकते. त्यामुळे नियमितपणे आपले पासवर्ड बदलत राहा. अनेक बँका दर दोन आठवडय़ांनी नेटबँकिंगचा पासवर्ड बदलण्याची सूचना देत असतात. अशा वेळी बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र तुमचे दुर्लक्ष सायबर हल्लेखोरांच्या पथ्यावर पडते.

* आर्थिक व्यवहार करण्यासाठी संस्था अथवा बँका त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाचा इंटरनेटवरचा पत्ता (वफछ) तुम्हाला पाठवतात. तो पत्ता ‘ँ३३स्र्२://’ या शब्दाने चालू होत नसेल तर अजिबात व्यवहार करू नका.  ‘ँ३३स्र्://’ या शब्दाने चालू होणारी सर्वच संकेतस्थळे सुरक्षित नसतात. अशा संकेतस्थळांवरील तुमची माहिती कुठलीही व्यक्ती चोरू शकते.

* चॅटिंग करताना तुमच्या आर्थिक वा व्यक्तिगत सुरक्षिततेबाबतची कोणतीही माहिती ‘शेअर’ करू नका. त्या माध्यमातूनही ही माहिती सायबर चोरांपर्यंत पोहोचू शकते.

* ऑनलाइन व्हिडीओ चॅटिंग करत असाल तर वापर होताच मायक्रोफोन व वेबकॅम बंद झाल्याची खात्री करून घ्या. एरवी ते झाकून ठेवा.

* अनोळखी ईमेल, पायरेटेड सॉफ्टवेअर, गेम डाऊनलोड करू नका. या फाइलमधून एखादा स्पायवेअर तुमच्या संगणकात शिरकाव करू शकतो.

* दर दोन दिवसांनी संगणकावरील ‘टेंपररी फाइल्स’ हटवा. जुनी ‘वेबपेजेस’ही नियमितपणे हटवा.

* संगणकात चांगला अ‍ॅण्टिव्हायरस असणे आवश्यक आहे. त्यासोबतच तो वेळोवेळी अपडेट होतोय का, याचीही खातरजमा करून घ्या. या अ‍ॅण्टिव्हायरसच्या साह्य़ाने अधूनमधून संगणक ‘स्कॅन’ करा.

* पेनड्राइव्ह किंवा अन्य कोणतेही ‘रिमूव्हेबल स्टोअरेज’ जोडताना ते नक्की स्कॅन करून घ्या.

* ईकॉमर्स संकेतस्थळांचा नियंत्रित वापर करा. समाजमाध्यमांवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या लिंक ‘क्लिक’ करू नका.

–  प्रा. योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)