ठाणे पोलिसांची कडक कारवाई; १५५ मद्यधुंद चालकांकडून जबर दंडवसुली श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला ‘गटारी’ साजरी केल्यानंतर मद्याच्या धुंदीत वाहन चालवणाऱ्या १५५ जणांची झिंग ठाणे वाहतूक पोलिसांनी रविवारी रात्रीच उतरवली. याखेरीज गटारीच्या निमित्ताने नैसर्गिक पर्यटन स्थळी जाऊन मद्यपाटर्य़ा करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांवरही पोलिसांनी कारवाई केल्याने अनेकांसाठी यंदाची गटारी ‘संस्मरणीय’ ठरली! सोमवारपासून सुरू झालेल्या श्रावण महिन्याच्या आधी गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र गटारीचा ज्वर चढला होता. ठाणे जिल्ह्य़ातील डोंगररांगांतील धबधबे, नद्या, फार्म हाऊस अशा पर्यटन स्थळी जाऊन गटारी साजरी करण्याचे बेत शिजवले गेले होते. अशा ठिकाणी मद्यप्राशन केल्यानंतर होणारी हुल्लडबाजी आणि दुर्घटना यांना चाप लावण्यासाठी ठाणे पोलिसांनीही यंदा जय्यत तयारी केली होती. ठाणे ते बदलापूपर्यंतच्या प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या ठिकाणी वाहनचालकांची मद्यतपासणी तसेच वाहनांमधून मद्याची अवैध वाहतूक केली जात आहे का, याची पाहणी केली गेली. यात दोषी आढळलेल्या १५५ मद्यपी चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. तसेच कारवाईत आढळलेल्या मद्याच्या बाटल्याही जागेवरच नष्ट करण्यात आल्या. ठाण्यात पाटर्य़ासाठी कायमच आकर्षणाचे ठिकाण असलेल्या येऊर परिसरातदेखील गटारीच्या दिवशी वन विभाग, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. येऊरच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी सुरक्षा ठेवल्याने या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश नव्हता. येऊर गावात पाटोणापाडा, वनीचापाडा, डीएसपी गेट या परिसरांत वन विभागाचे कर्मचारी गस्त घालून होते. त्यामुळे या ठिकाणी गटारीच्या पाटर्य़ाना आळा बसल्याचा दावा वन विभागातर्फे करण्यात आला आहे.