जमीन संपादनाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी आक्रमक पवित्रा उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) ते वडोदरा दरम्यान उभारण्यात येणाऱ्या महामार्गाच्या कामात अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. जमीन संपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी येथील शेतकरी आक्रमक झाले असून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना विरोध करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. वांगणी आणि बदलापूर शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील कुडसावरे इदगाव येथील उल्हास नदीवरील पुलाचा शुभारंभ नुकताच खासदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांनी भेटून त्यांना निवेदन दिले. त्यावर ते बोलत होते. जवाहरलाल नेहरू बंदर ते वडोदरा महामार्गाचा बराचसा भाग अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातून जातो. या महामार्गासाठी या भागातील शेकडो हेक्टर शेत जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक बनले असून विमानतळ प्रकल्पग्रस्तांना ज्याप्रमाणे मोबदला दिला गेला, त्या तुलनेत पुनर्वसन धोरण जाहीर करावे, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी मध्यंतरी महामार्गासाठी सुरू झालेले सर्वेक्षणही बंद पाडले. आधी योग्य मोबदला जाहीर करा, मगच महामार्गासाठी सर्वेक्षण सुरू करा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा हा महत्त्वाकांक्षी रस्ता प्रकल्प शेतकऱ्यांच्या विरोधात अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, या प्रश्नावर खासदार कपिल पाटील यांची भेट घेऊन या भागातील शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी लावून धरली. या प्रसंगी बोलताना पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला मागणीला पाठिंबा दर्शविला. आधी शेतकऱ्यांना योग्य मोबदला जाहीर करा, मगच महामार्गाचे काम हाती घ्यावे, असा सूरही त्यांनी लावला. वांगणी-बदलापूर प्रवास वेगवान वांगणी आणि बदलापूरच्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कुडसावरे आणि इदगाव येथील उल्हास नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. विक्रमी अशा अडीच महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून यामुळे वांगणी परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा फेरा वाचणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची मागणी होत होती. या पुलामुळे रायगड आणि ठाणे जिल्हा आणखी एका मार्गाने जोडला जाणार आहे. अडीच महिन्यांत काम पूर्ण या पुलाची लांबी १९८ मीटर असून ७.५ मीटर उंचीच्या या पुलाचे काम अवघ्या अडीच महिन्यांत पूर्ण झाले आहे. या पुलासाठी ‘नाबार्ड’कडून अर्थसाहाय्य झाले असून अठरा महिन्यांची मुदत असतानाही वेळेआधी काम पूर्ण झाल्याने ८३ लाखांची बचतही झाली आहे. या पुलामुळे सावरे कान्होर, काराव, पाषाणे, बदलापूर, इदगाव ठाकूरवाडी, कुडसावरे, वांगणी आदी गावांना फार मोठा लाभ मिळणार आहे.