ठाणे येथील मुख्य बाजारपेठेमधील खारकर आळी परिसरात असलेल्या कृष्ण मंदिरात (श्रीनाथजी) जन्माष्टमीच्या दिवशीच देवाचे सोन्या-चांदीचे दागिने, भांडी आणि देणगीची रोख रक्कम असा ३८ लाख ५० हजारांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा सर्व ऐवज जन्माष्टमी उत्सवासाठी बँकेतून मंदिरात आणून ठेवण्यात आला होता. अवघ्या काही तासांत या गुन्ह्य़ातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. चोरीस गेलेला ऐवज आरोपींकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून या वृत्तास ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दुजोरा दिला आहे. खारकर आळी भागात वैष्णव समाजाचे कृष्ण मंदिर आहे. शंभर ते सव्वाशे वर्षे जुने हे मंदिर असून त्यास श्रीनाथजी मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पुजारी राहतात. रविवारी कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम असल्यामुळे मंदिर व्यवस्थापन समितीने शनिवारी बँकेतून देवाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि भांडी आणली होती. मंदिरातील एका खोलीमधील कपाटामध्ये समितीने हा ऐवज ठेवला होता. या मध्यरात्री चोरटय़ांनी हे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि त्यानंतर कपाटातून देवाचे सोन्या-चांदीचे दागिने, भांडी असा ऐवज लुटून नेला. त्यासोबत मंदिरात देणगीतून जमा झालेली रोख रक्कमही चोरटय़ांनी चोरून नेली. रविवारी पुजारी घरातून खाली उतरले, त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, तर मंदिराच्या पाठीमागील बाजूस मात्र कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. चोरीनंतर मात्र किल्ली कपाटालाच सोडून निघून गेले होते. या प्रकारामुळे तसेच घटनास्थळाच्या पाहणीवरून परिचित व्यक्तीचा या गुन्ह्य़ात सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात होती. या तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासात तीन आरोपींना अटक करून ऐवज जप्त केला आहे.