खारेगावलगत पूर्व द्रुतगती महामार्गावर खारफुटींवर भराव टाकून गोदामांची उभारणी ठाणे : जिल्ह्यातील कांदळवनांच्या संरक्षणासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय आखले जात असताना पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे महापालिका क्षेत्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर डेब्रिजमाफियांचा अक्षरश धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. खारेगाव टोल नाक्यापासून जेमतेम ५०० मीटरच्या अंतरावर महामार्गास लागून असलेल्या खाडीकिनारी दिवस-रात्र शेकडोंच्या संख्येने बांधकाम साहित्याने भरलेल्या गाडय़ा रित्या केल्या जात असून बेकायदा भरणी करून उभ्या राहत असलेल्या बेटांवर लगोलग गोदामे उभी केली जात असल्याने तिवरांच्या जंगलांची बेसुमार कत्तल केली जात आहे. विशेष म्हणजे, खाडीकिनारी बांधकाम साहित्याची वाहने रिकामी करण्यासाठी मुंबई, ठाणे, भिवंडीतून काही कोटींची कंत्राटे घेतली जात असल्याचे आढळून आले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांच्या खाडीकिनाऱ्यांवर बांधकाम कचरा रिकामा करीत तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल करण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढीस लागले असून भिवंडीतील खाडीकिनारा गोदामांसाठी बुजविल्यानंतर माफियांनी आपला मोर्चा ठाण्याच्या वेशीकडे वळविला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या बाजूकडील खारेगाव टोल नाका ओलांडल्यावर खाडीकिनारी बांधकाम कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची अलीकडच्या काळात रांग दिसू लागली आहे. तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल करीत खाडीकिनारी बांधकाम साहित्याचा भरणा केला जात असून त्यावर गोदामांची उभारणी सुरू झाली आहे. भरणा केलेल्या जागेवर तात्पुरते शेड काटून काही बडय़ा वाहन कंपन्यांची गोदामे सुरू झाली असून स्थानिक तहसीलदार यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर खाडीकिनारी जिल्हा प्रशासनाने जागोजागी तिवरांच्या झाडांची कत्तल करू नये, असे आवाहन करणारे फलक लावले आहेत. या फलकांना लागूनच तिवरांच्या जंगलांवर बांधकाम साहित्य रिते केले जात आहे. ठाणे महापालिका हद्दीपासून हे क्षेत्र जेमतेम ५०० मीटर अंतरावर आहे. मात्र महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष होत असून जिल्हा प्रशासनातील स्थानिक अधिकारी आणि पोलीस यंत्रणाही डोळेझाक करीत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता आहे. बांधकाम कचऱ्याचीही विल्हेवाट मुंबई, ठाणे परिसरात मोठय़ा प्रमाणात गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या ठिकाणी निर्माण होणाऱ्या बांधकाम कचऱ्याचे प्रमाण बरेच मोठे असल्याने गेल्या काही वर्षांत या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी माफियांची एक मोठी टोळी सक्रिय झाली असून ठाणे, नवी मुंबई, भिवंडी या भागांत या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचे व्यवहार सुरू असतात. बांधकाम कचऱ्याच्या विल्हेवाटीची कंत्राटे घेऊन हा कचरा खारफुटींवर टाकण्यासाठी कोटींची कमाई करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.