आंबे विक्री स्टॉल लावण्यावरून ठाण्यात मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते गुरूवारी रात्री चांगलेच भिडले होते. हा राडा एवढा मोठा होता की पोलिसांना लाठीचार्ज करून मनसे आणि भाजपा कार्यकर्त्यांना पांगवावं लागलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी चौकीदार चोर है या घोषणाही दिल्या होत्या. दरम्यान आज पुन्हा एकदा हा आंबे विक्री स्टॉल मनसेने ठाण्यात सुरू केला आहे. हा स्टॉल विनापरवाना उभारल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

ठाण्यातील मनसे कार्यालयाच्या बाहेर गुरूवारी भाजपा आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष एकमेकांना भिडले. एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिव्याही दिल्या. हा राडा इतका वाढला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र गुरूवारी झालेल्या वादानंतर मनसेने पुन्हा एकदा आंबा विक्री स्टॉल उभारला. एवढंच नाही तर शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपाच्या स्थानिक नगरसेविकेवर पैसे मागितल्याचा आरोपही स्टॉल धारकाने केला आहे. भाजपाच्या शहराध्यक्षांनी या स्टॉलसंदर्भात तातडीने पत्रकार परिषद घेऊन आंबे विक्री स्टॉलला परवानगी नसल्याचं म्हटलं आहे. तसेच या स्टॉलवर कारवाईची मागणी करणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

ठाणे महापालिकेने मनसेने लावलेल्या या आंबा विक्री स्टॉलला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मनसे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. १७ मे रोजी मनसे ठाण्यात मोर्चा काढणार आहे. या मोर्चात स्वतः राज ठाकरेही उपस्थित असण्याची शक्यता आहे. या मोर्चात ठाण्यातले शेतकरी, आंबा विक्रेते आणि मनसे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हा मोर्चा महापालिका आणि भाजपाच्या विरोधात होणार असल्याने वाद आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.