वाणिज्य पदव्युत्तर पदवीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी; ३१ जानेवारीपर्यंत मुदत

भगवान मंडलिक, कल्याण</strong>

वाणिज्य पदव्युत्तर पदवी (एम.कॉम.) अभ्यासक्रमाच्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती सवलतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. हे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना आठ ते १५ हजार रुपये शुल्क भरावे लागेल. अन्यथा परीक्षेला मुकावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘महाडीबीटी आपले सरकार’ संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज भरून पाठवायचे आहेत. एससी, एसटी, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ते स्वीकारले जातात. मात्र ‘इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे’ (ओबीसी) अर्ज भरल्यानंतर ते पाठवण्याच्या प्रक्रियेच्या वेळी ‘हा अभ्यासक्रम शुल्क सवलतीसाठी पात्र नाही. आपण समाज कल्याण विभागाशी संपर्क साधा आणि पात्र सवलत अभ्यासक्रमाची यादी मागवून घ्या,’ असा संदेश (एरर) येत आहे, असे विद्यार्थी, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे अर्ज ऑनलाइनच भरायचे असल्याने महाविद्यालयात तक्रार किंवा चौकशी करूनही उपयोग होत नाही. शहापूर, मुरबाडच्या ग्रामीण भागांत इंटरनेट, सायबर कॅफेची सुविधा नसते. तेथील विद्यार्थ्यांची अडचण विचारात घेऊन काही महाविद्यालयांनी महाविद्यालयात सवलत शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्याची सुविधा दिली आहे.

अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सात ते आठ कागद स्कॅन करून पाठवयाचे आहेत. ‘ओबीसी’ अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाविद्यालय प्रशासन प्रयत्न करत आहे. शासन स्तरावरून त्यांनाही कोणी अर्ज का नाकारले जात आहेत, ‘एरर’ दूर कसा करावा, याविषयी मार्गदर्शन करत नाही, असे महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी हे अर्ज लिखित स्वरूपात महाविद्यालयांतून भरण्यात येत होते, मात्र त्यामुळे काही विद्यार्थी अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन प्रत्येक अभ्यासक्रमात शुल्क सवलत मिळवत, असे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे शासनाने लिखित अर्ज पद्धत बंद करून ऑनलाइन पद्धतीने शुल्क सवलत अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे.

नवी पद्धत खूप चांगली आहे, असे अनेक महाविद्यालयीन विश्वस्त, प्राचार्यानी सांगितले. ही पद्धत लागू करण्यापूर्वी शासनाने जिल्ह्य़ातील प्रत्येक महाविद्यालयातील किमान दोन कर्मचाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक होते. तसे न करता ही पद्धत थेट सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी आल्या तर महाविद्यालय स्तरावर सोडविताना अडचणी येत आहेत, असे कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप कला, वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांचे अर्ज भरून झालेले नाहीत, तर अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती आहे. जीवनदीप महाविद्यालयात मुरबाड, शहापूर ग्रामीणमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून महाविद्यालय प्रशासन प्रयत्न करत आहे, असे घोडविंदे यांनी सांगितले. एम.कॉम. अभ्यासक्रमाच्या विशिष्ट विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही अडचण येत आहे. ‘अ‍ॅडव्हान्स अकौन्टसी’च्या विद्यार्थ्यांना अडचण येत नाही. अन्य विषयांना शिष्यवृत्ती अर्ज भरताना अडचणी येत आहेत, असे डोंबिवलीतील प्राचार्यानी सांगितले.

तक्रारींची दखल घेऊन वरिष्ठांना दोन महिन्यांपूर्वीच अहवाल पाठवण्यात आले आहेत. विविध विभागांतील माहिती, उच्चशिक्षण विभाग, महाविद्यालयांनी विषयवार ऑनलाइन उपलब्ध केलेली माहिती आणि संकेतस्थळावरील माहिती यांचा मेळ जुळत नसल्याने अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. हा प्रश्न १५ जानेवारीपर्यंत सुटून, एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये याची दक्षता घेत आहोत.

– प्रसाद खैरनार, साहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग

ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची सुविधा दिल्याने सवलतीचा गैरफायदा घेण्याच्या प्रकारांना आळा बसला आहे. महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देणे आवश्यक होते. तसे न झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे कर्मचाऱ्यांना जमत नाही. सव्‍‌र्हरवर राज्यातील महाविद्यालयांचा भार येत असल्याने तो सतत बंद पडतो. शासनाने तांत्रिक समस्या दूर करावी. विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहोत.

– रवींद्र घोडविंदे, अध्यक्ष, जीवनदीप महाविद्यालय, गोवेली