नितीन गडकरींच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी डोंबिवलीचा उल्लेख सर्वात घाणेरडे शहर असा करताच महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी या मुद्दयावरून रान पेटविण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे स्थानिक नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राज्यमंत्री रिवद्र चव्हाण यांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

कल्याण डोंबिवली ही शहरे अतिक्रमण मुक्त आणि पर्यायाने ‘स्वच्छ’ करू पहाणारे माजी महापालिका आयुक्त ई. रिवद्रन यांच्यावर वेळोवेळी कोणी दबाव आणला आणि कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांची अवघ्या दोन महिन्यांत बदली करण्यात आली, त्या मंत्र्याचे नावही गडकरी यांनी जाहीर करावे, असे आव्हान शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिल्याने शिवसेना-भाजपचे नेते पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. डोंबिवलीतील भाजपच्या एका नगरसेवकाच्या हत्येची सुपारी दुसरा नगरसेवक देतो आणि गुन्हा दाखल होऊनही या नगरसेवकाला वाचविण्यासाठी जंगजंग पछाडले जाते. यावरून सुसंस्कृत डोंबिवली अराजकतेकडे कोण लोटत आहे, असा सवालही शिवसेना नेत्यांनी केला आहे.

डोंबिवलीत शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली हे अस्वच्छ आणि घाणेरेडे शहर असल्याचा उल्लेख केला. तसेच बेकायदा बांधकामे पाठीशी घालण्यासाठी दबाव आणणाऱ्या राजकीय नेत्यांना डोंबिवलीकर का निवडून देतात, असा सवालही गडकरी यांनी उपस्थित केला.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपला खिंडीत गाठू पहाणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या हाती आयता मुद्दा सापडला असून मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून चर्चेत असलेले राज्यमंत्री रिवद्र चव्हाण यांनाही गडकरी यांच्या वक्तव्यामुळे घरचा आहेर मिळाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.