अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिका क्षेत्रातील दुकाने शनिवारपासून (३० मे) सुरू करण्यास प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू करण्याचा प्रयोग करणारी मुंबई महानगर क्षेत्रातील आणि लाल पट्टय़ात मोडणारी ही दोन पहिली शहरे ठरणार आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील स्थानिक दुकानदारांशी चर्चा केल्यानंतर या दोन्ही नगरपालिका क्षेत्रात दुकाने सुरू करावीत असा प्रस्ताव प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी पाठविला होता. या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यात रेस्टॉरंट, पोळीभाजी केंद्र आणि हॉटेल पार्सल सेवेसाठी खुली ठेवता येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वारनिश्चिती.. एक दिवसाआड चक्राकार पद्धतीने ही दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहतील. हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, जनरल स्टोअर, भांडी, खेळणी, बांधकाम साहित्य, शालेय साहित्य, चष्म्याची दुकाने, पिठ गिरणी, फर्निचर आणि फॅब्रिकेशनची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी. तर सोने-चांदी, कपडे, टेलर, पादत्राणे, फोटो स्टुडिओ, मोबाइल, घडय़ाळ, गॅरेज, लाँड्री, आईसक्रीम, मिठाई, बेकरी अशी दुकाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सुरू  राहतील.

ही दुकाने बंदच : शॉपिंग मॉल, दुकानकेंद्र, पानटपरी, गुटखा, तंबाखूची दुकाने, ऑम्लेट, चायनीज, पाणीपुरी, पावभाजी अशा हातगाडय़ा, न्याहारीची ठिकाणे, रसवंती बंदच राहतील. रस्त्यावर, उघडय़ावर खाद्यपदार्थ बनवण्यास बंदी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.