शहरातील मुख्य चौक, रस्त्याकडेच्या कचराकुंडय़ा हटवण्यास सुरुवात; कचरा टाकणाऱ्यांना पाचशे रुपये दंड ठाणे : ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत पाहणीदरम्यान कचरा ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडय़ा आणि त्यामुळे पसरलेली दुर्गंधी हे विद्रूप चित्र दिसू नये, यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या कडेला तसेच मुख्य चौकात ठेवलेल्या कचराकुंडय़ा हटवण्यास सुरुवात केली आहे. तसेच कचराकुंडय़ा हटवल्यानंतर त्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारण्याचा इशाराही दिला आहे. या ठिकाणी सुरुवातीला काही दिवस सुरक्षारक्षकही तैनात करण्यात येणार आहेत. ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांमधून दरदिवशी ९६० पेक्षा अधिक मेट्रिक टन घनकचरा निर्माण होत असतो. घंटागाडी योजना अस्तित्वात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंडय़ा हटविण्यात याव्यात असे शासनाचे आदेश होते. असे असले तरी अजूनही अनेक शहरांमध्ये कचराकुंडय़ा हटविण्यात आलेल्या नाहीत. स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या सर्वेक्षणात कचराकुंडय़ा कायम असलेल्या शहरांचे गुणांकन कमी होत असते. स्वच्छ शहरांच्या यादीत सातत्याने पिछाडीवर राहिलेल्या ठाणे महापालिकेस या गुणांची फिकीर नसल्याचे चित्र अनेक वर्षांपासून कायम होते. घंटागाडीची सुविधा असतानाही शहरातील रस्त्याकडेला कचराकुंडय़ा उभारण्यात आल्या होत्या. या कुंडय़ांची संख्या सुमारे २०० इतकी असून अनेक नागरिकांकडून त्यामध्ये कचरा टाकला जातो. या कुंडय़ांमध्ये दररोज शेकडो किलो कचरा जमा होत असतो. या कचऱ्याचे प्रमाण इतके असते की, कुंडीच्या बाहेरही हा कचरा पडलेला असतो. त्यामुळे रस्त्याकडेला संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरत असते. यावर उतारा म्हणून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ठाणे शहरातील सर्वच कचराकुंडी हटविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच रस्त्याकडेला असलेल्या सुमारे २०० कचराकुंडय़ा महापालिकेने हटविल्या आहे. कचराकुंडय़ा हटवल्यानंतर या ठिकाणी फलकही उभारण्यात येत असून नागरिकांना कचरा न फेकण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही कचरा टाकणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ही मोहीम करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील कचरा कुंडय़ा हटविण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणी पुन्हा कचरा फेकणाऱ्यास ५०० रुपये दंडही आकारण्यात येईल. - अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका. रस्त्याकडेला असलेल्या या कचराकुंडय़ांमध्ये अनेकदा भटके श्वान किंवा गाई फिरतात. त्यामुळे संपूर्ण घाणीचे साम्राज्य निर्माण होत असते. अनेकदा कचरा मुख्य रस्त्यावर येतो. मात्र, आता कचराकुंडय़ा हटल्याने महापालिकेच्या या निर्णयामुळे शहर स्वच्छ होण्यास मदत होईल. - रणजीत पाटील, रहिवासी.