नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारी;  आयुक्तांचे दमदार सादरीकरण

ठाणे शहरात ‘स्मार्ट सिटी’ची योजना राबविताना ठाणेकर नागरिकांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी आयोजित केलेली बैठक काही नागरिकांनी व्यक्तिगत तक्रारी आणि समस्यांचा पाढा वाचल्याने काहीशी भरकटल्याचे चित्र दिसले. आमच्या प्रभागात रस्ता नाही, वाहतूक कोंडीवर पर्याय काय, मूलभूत सोयी-सुविधा पुरवत नसाल तर स्मार्ट शहराच्या गप्पा कशासाठी मारता, असे थेट आणि रोखठोक सवाल काही नागरिकांनी उपस्थित करत महापौर संजय मोरे यांच्यासह उपस्थित अधिकारीही अवाक झाले. रहेजा येथील महापालिकेच्या मालकीच्या तरणतलावात ठेकेदाराची सद्दी कशी चालते, असा सवालही काही रहिवाशांनी यावेळी उपस्थित केला. ठाणेकर नागरिकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे चर्चा भरकटते आहे हे लक्षात येताच महापौर संजय मोरे यांना हात जोडून शांत रहाण्याची विनंती करावी लागली. त्यानंतरही काही संतप्त नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवली होती.

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी देशभरातील काही निवडक शहरांमधून ठाणे शहराची निवड केली आहे. त्यामुळे ही योजना राबविण्यापूर्वी नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस ठाणेकरांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती दाखवली. मात्र, सूचना मांडताना काही ठाणेकरांनी शहरातील विवीध समस्यांचा पाढा वाचला. काही नागरिकांनी अधिकाऱ्यांवर व्यक्तीगत स्वरुपाचे आरोपही केले. दरम्यान, नागरिकांशी संवाद साधताना आयुक्त जयस्वाल यांनी ही योजना राबविताना रहिवाशांचा सहभाग महत्वाचा असल्याचे मत मांडले.

तरणतलावावरून धारेवर

ठाण्यातील रहेजा गार्डन येथील तरणतलावावच्या प्रश्नावरून स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे जाब विचारण्यास सुरुवात केला. नागरिकांनी पालिकेवर टीका सुरू केल्याने पालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांकडून ध्वनीक्षेपक खेचण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे नागरिकांचा संताप अधिकच वाढला होता.

एकाचवेळी अनेक प्रश्नांची सरबत्ती झाल्याने पालिका अधिकारीही हतबल झाले होते. ठाणे पूर्वेकडील सॅटीस, वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा आदी चांगले मुद्दे ठाणेकरांकडून उपस्थित करण्यात आले.

नवनवीन प्रकल्प शहरात यावेत अशी सर्वाची इच्छा असते. पण काही जणांकडून त्यास विरोध होतो.  त्यामुळे नागरिकांनी यापुढे प्रकल्पांच्या बाजूने उभे राहून आवाज उठवला पाहिजे. शहरामध्ये मुळात प्रकल्प राबवण्यासाठी पुरेशा जागा नाहीत. शिल्लक आहेत त्या जागांमध्ये असे नवे प्रकल्प राबवणे शक्य आहे. परंतु त्यासही विरोध होतो. हा प्रकल्प आमच्या इथे नको अशी मानसिकता नागरिकांनी बदलली पाहिजे.
– संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महापालिका