सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उद्देशाला हरताळ; ध्वनिप्रदूषणामुळे स्थानिक हैराण

ठाणे : ठाणे शहरातील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने ठाणे महापालिकेने शहरातील प्रमुख ठिकाणी उभारलेले खुले रंगमंच सध्या लग्नसोहळय़ांचे ठिकाण बनू लागले आहेत. सध्या लगीनसराईच्या दिवसांत या खुल्या रंगमंचांवर लग्नांचे कार्यक्रमच आयोजित केले जात असून या सोहळय़ांतील दिव्यांचा झगमगाट आणि वाद्यांचा दणदणाट यामुळे परिसरातील ध्वनी तसेच प्रकाशप्रदूषणात वाढ होत आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत वर्तकनगर येथील वेदांत गृहसंकुलासमोर, रघुनाथ नगर येथील रहेजा गृहसंकुलापुढील रंगमंच, वैतीवाडी येथील रंगमंच अशा काही प्रशस्त रंगमंचांवर लग्नसराईच्या काळात लग्न सोहळ्यांचीच ‘वरात’ सुरू असते. लग्नांच्या वरातीचे बॅण्ड, फटाक्यांची आतषबाजी रात्री उशिरापर्यंत येथे सुरू असते. लग्नासाठी केली जाणारी रोषणाई अत्यंत प्रखर असल्यामुळे वर्तक नगर येथील वेदांत सोसायटीतील रहिवाशांना त्याचा त्रास होतो. प्रदूषणामुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी वारंवार पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या. मात्र, मंडप डेकोरेटरच्या काही मजुरांना पकडून थातुरमातुर कारवाई केली जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे रहिवाशांनी थेट आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने येथील कार्यक्रमांसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली ठरवून दिली. मात्र, तरीही पालिकेचे नियम धाब्यावर बसवून इथे ‘कल्लोळ’ सुरू असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

पालिकेचे नियम धाब्यावर.

प्रकाशयोजना करताना दिव्यांची दिशा जमिनीकडच्या बाजूला ठेवावी, ५५ डेसिबल्सपेक्षा जास्त आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी, रात्री दहानंतर कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ  नये, या परिसरात आवाजविरहित फटाक्यांनाच परवानगी द्यावी, या अटींचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी नियमावली तयार करून त्याचा फलक रंगमंचाच्या प्रवेशद्वारापाशी लावण्यात आला आहे. मात्र या फलकावरच पडदा टाकून नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत.