१३ व्होल्वो बसेस नादुरुस्त; दिवसाकाठी सव्वातीन लाख रुपयांचा फटका ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) ताफ्यातील ३० पैकी १३ व्होल्वो बसगाडय़ा गेल्या आठ दिवसांपासून नादुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे शहर आणि शहराबाहेरील मार्गावर विशेष मागणी असलेल्या व्होल्वो बसगाडय़ा नादुरुस्त झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. नादुरुस्त बसगाडय़ांमुळे टीएमटीला दिवसाकाठी सव्वा तीन लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत टीएमटीच्या ताफ्यात वातानुकूलित बसेस दाखल झाल्या आहेत. बोरिवली, बिकेसी तसेच अंधरी अशा मार्गावर या वातानुकूलित बसेस सोडण्यात येतात. टीएमटीने ३० व्होल्वो बसच्या गाडय़ांची खरेदी करून त्यातून प्रवाशी वाहतूक सुरू केली. या माध्यमातून चांगली प्रवासी सुविधा पुरविण्यात येते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून त्याचा फायदा टिएमटीला होऊ लागला आहे. या बसगाडय़ांमधून टीएमटीला सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे. असे असतानाच गेल्या आठ दिवसांपासून ३० पैकी १३ व्होल्वो बसगाडय़ा नादुरुस्त असल्याची बाब मंगळवारी झालेल्या परिवहनच्या बैठकीत उघड झाली. शिवसेनेचे परिवहन सदस्य प्रकाश पायरे यांनी ३० पैकी १३ व्होल्वो बसगाडय़ा नादुरुस्त असल्याचा मुद्द उपस्थित करत परिवहन प्रशासनावर टीकेचा भडिमार केला. १३ पैकी ९ बसगाडय़ांच्या डिझेल टाकीमध्ये पाणी गेल्यामुळे गाडय़ांची यंत्रणा खराब झाली आहे. तर उर्वरित तीन बसगाडय़ा काचेच्या दुरुस्तीसाठी आगारात धूळ खात उभ्या आहेत. २ ऑगस्टपासून या बसगाडय़ा मुल्लाबाग आगारात उभ्या असल्यामुळे टीएमटीला दररोज एका बसमागे २५ हजार रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. तसेच एकूण १३ नादुरुस्त बसगाडय़ांमुळे टीएमटीचे दिवसाचे सव्वा तीन लाखांच्या उत्पन्न बुम्डत असून या बसगाडय़ा महिनाभर अशाच ना दुरुस्त राहिल्या तर टीएमटीला महिन्याकाठी एक कोटी रुपयांच्या उत्पन्न पाणी सोडावे लागले, अशी भीती पायरे यांनी सभेत व्यक्त केली. दरम्यान, या बसगाडय़ा तातडीने दुरुस्त करून रस्त्यावर उतरविण्याचे आदेश यापूर्वीच संबंधित विभागांना दिले असून त्याच्या दुरुस्तीच्या कामे तात्काळ करण्यात येतील, असे प्रभारी टीएमटी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिली. वागळे आणि कळव्याची पुनरावृत्ती नको.. वागळे आणि कळवा आगारामध्ये अन्य बसगाडय़ांच्या दुरुस्तीसाठी एका बसगाडीचे स्पेअरपार्ट काढून वापरले जायचे. त्यामुळे ज्या बसगाडीचे स्पेअर पार्ट काढले ती चांगली गाडी भंगारात निघायची आणि बसेसच्या संख्येतही घट व्हायची. त्याचप्रमाणे मुल्लाबाग आणि आनंदनगर डेपोमध्येही असाच काहीसा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही आगारात वागळे आणि कळवा आगाराची पुनरावृत्ती नको, अशी मागणी शिवसेनेचे परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक यांनी केली.