ठाणे : कल्याण येथे रिक्षावर वृक्ष कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी ठाण्यातील राबोडी भागात गुलमोहरचे वृक्ष रिक्षावर कोसळून प्रवाशाचा मृत्यू झाला. तौफिक सौदागर (२७) असे मृताचे नाव आहे. तर रिक्षा चालक शफीक शब्बीर (५०) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.राबोडी येथील रुणवाल नगर परिसरात बुधवारी सायंकाळी शफीक शब्बीर यांच्या रिक्षातून तौफिक हे प्रवास करत होते. ते राबोडी भागातील सरस्वती शाळा परिसरात वास्तव्यास होते.

बुधवारी सायंकाळी ते रुणवाल नगर परिसरातून वाहतुक करत असताना ते प्रवास करत असलेल्या रिक्षावर गुलमोहरचे वृक्ष कोसळले. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे वृक्षप्राधिकरण विभाग, उथळसर प्रभाग समितीचे अधिकारी, राबोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत तौफिक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर शफीक यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाटी परिसरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.