कल्याण : आपला व्याजाचा व्यवसाय वाढीस लागावा यासाठी उल्हासनगर मधील एका पुजाऱ्याच्या घरी गेल्या पाच दिवसापूर्वी पहाटेच्या वेळेत सशस्त्र दरोडा टाकून त्याच्या घरातील किमती ऐवज, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ११ लाखाचा ऐवज लुटून नेणाऱ्या टोळीला कल्याण गुन्हे शाखा, उल्हासनगर खंडणी विरोधी पथकाने शिताफीने सोमवारी अटक केली.अकबर खान (रा. संतोषनगर, मुंब्रा) हा टोळीचा प्रमुख आहे. असिफ वारीस अली शेख (रा. उत्तरशीव, दहिसर, मुंब्रा), शिवसिंग वीरसिंग शिकलकर (रा. अटाळी, आंबिवली, कल्याण), राहुलसिंग बबलुसिंग जुनी (रा. शेलार नाका, त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी, डोंबिवली पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या दरोडेखोरांनी उल्हासनगर येथील दरोड्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपींना विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी सांगितले, पाच दिवसापूर्वी पहाटे या टोळीने उल्हासनगर श्रीराम चौकातील जकी जग्यासी यांच्या घरात दरोडा टाकला. जकी हे घरात झोपले असताना त्याची त्यांना चाहूल लागू दिली नाही. दरोडेखोरांनी जग्यासी यांच्या घरातील घरातील ११ लाखाचा किमती ऐवज लुटून नेला. सकाळी उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जकी यांनी तक्रार केली.या गुन्ह्याचा तपास विठ्ठलवाडी पोलीस, कल्याण गुन्हे, उल्हासनगर खंडणी विरोधी पथकाने समांतर सुरू केला. यासाठी आठ तपास पथके तयार करण्यात आली होती. जकी जग्यासाठी यांच्या घराजवळ येण्यासाठी आरोपींनी मारुती इको वाहन वापरले होते. ते परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत होते. त्या वाहनाचा क्रमांक पथकाने शोधून काढला. त्याच्या मालकाचा शोध घेतला असताना मालक अरुण येट्या पाटील यांचे हे वाहन त्यांच्या पनवेल जवळील रोडपाली गावातील घर जवळून चोरीला गेल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी रोडपाली गाव, कळंबोली, तळोजा, दहिसर, मुंब्रा मार्गातील १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यांना महिंद्रा क्वान्टो वाहन चित्रीकरणात दिसत होते. पोलिसांनी त्या वाहनाचा तपास घेतला. ते वाहन मुंब्रा येथील अकबर खान याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी करताच त्याने इतर तीन आरोपीं सोबत आपण उल्हासनगर येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिली. अकबर खान याचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसाची वाढ व्हावी म्हणून त्याने हा दरोडा टाकला असल्याची कबुली खानने पोलिसांना दिली.वाहन क्रमांकांवरुन पोलिसांनी दरोडेखोरांना अटक केल्याने ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, मोहन कळमकर, हवालदार गुरुनाथ जरग, भगवान हिवरे, तानाजी पाटील यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यात महत्वाची कामगिरी केली.