ठाणे –घोडबंदर येथील गायमुख भागात बुधवारी पहाटे रिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रिक्षा उलटल्याने लागलेल्या आगीत प्रवासी महिलेचा होरपळून मृत्यू झाला. तर रिक्षाचालक राजेश कुमार यादव या घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
घोडबंदर येथून रिक्षाचालक राजेश कुमार यादव हा महिला प्रवासीला घेऊन घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येत होता. पहाटे ५.४५ वाजताच्या सुमारास रिक्षा गायमुख पोलीस चौकी जवळ आली असता यादव याचा रिक्षा वरील ताबा सुटला आणि रिक्षा दुभाजकाला जाऊन आदळली. यानंतर रिक्षाने अचानक पेट घेतला.
पोलीस चौकी जवळ असलेल्या पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला संपर्क साधला तसेच बचाव कार्याला सुरुवात केली. पोलिसांनी जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले परंतु प्रवासी महिला रिक्षातच अडकून होत्या. अग्निशमन दलाच्या दलाचे जवान दाखल झाल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु महिलेचा होरपळून मृत्यू झाला होता. या महिलेची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
