बदलापूरः बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर मातीची भर घालण्यात आली असून या मातीच्या भरावामुळे नदीचे वहनक्षेत्राचा आकार बदलल्याचे वनशक्ती संस्थेच्या पाहणीत समोर आले आहे. मातीच्या भरावामुळे अनेक झाडे नष्ट झाली असून पावसाळ्यात नदीचा प्रवाह वाढल्यास हा भराव वाहून पुढे नदीपात्रात साचेल. परिणामी बदलापूरसारख्या शहरावर पूरसंकट आणखी गडद होण्याची भीतीची वनशक्तीच्या स्टॅलीन दयानंद यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणात ज्यांनी भराव टाकला आहे त्यांच्याच खर्चाने तो काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पर्यावरण सचिवांना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदीवर सुमारे ५० लाखांहून अधिक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. बदलापूर शहराच्या काही अंतरावर बारवी धरणातून सोडलेले पाणी नदीला येऊन मिळते. त्यामुळे नदी प्रदुषण आणि अतिक्रमणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. उल्हास नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुरावमुळे बदलापूर पश्चिमेतील मोठा भाग आणि शेकडो घरे पाण्याखाली जातात. मात्र याच उल्हास नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
येथील सत्संग विहार या एका धार्मिक संस्थेच्या जागेत हा प्रकार झाला आहे. स्थानिक नागरिक, शहरातील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी आवाज उठवल्यानंतर येथील काम थांबले. उल्हास नदीच्या प्रदुषणाविरूद्ध लढणाऱ्या वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद यांनी नुकतीच या नदीच्या पात्राची पाहणी केली. त्यांच्या या पाहणीनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. नदीच्या पात्रात जमीन तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती स्टॅलीन यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे. नदीचे वहनक्षेत्र पूर्णपणे बदलल्याचे दिसून आले असून शेकडो झाडेही नष्ट झाली असल्याची माहिती वनशक्तीने पर्यावरण सचिवांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पावसाळ्यात उल्हास नदीच्या पाणी पात्रात वाढ होते. अशावेळी हा मातीचा भराव वाहून नदीपात्रात गाळ साचेल. यामुळे नदीची पाणी धारण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि जवळपासच्या भागात निश्चितच तीव्र पूर येईल, अशीही भीती वनशक्तीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
त्यांच्याच खर्चाने भराव काढा
संबंधित संस्थेने उल्हास नदीकाठी बेकायदेशीर इमारती बांधल्या आहेत. तसेच शेजारी रस्तेही उभारले आहेत. त्यामुळे हे सर्व बेकायदेशीर बांधकामे पाडून नदीला पूर्वीच्या नैसर्गिक स्थितीत आणण्याची विनंती वनशक्तीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच ज्यांनी मातीचा भराव टाकला आहे त्यांना त्यांच्या खर्चाने हा भराव काढण्याचे आदेश द्यावेत अशी आमची मागणी असल्याचे स्टॅलिन यांनी लोकसत्ताशी बोलताना म्हटले आहे.
पूरसंकट आणखी गडद
उल्हास नदीच्या किनारी राहणाऱ्या बदलापुरकरांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षात एकाच वर्षात दोनदा पुराचा फटका बसल्याचेही दिसून आले आहे. त्यात नदीपात्रात मातीचा भराव टाकल्याच्या प्रकारानंतर पुरसंकट आणखी गडद होण्याची भीती आहे. यंदाच्या वर्षात आणखी काही कुटुंब पुराच्या संकटात अडकण्याची भीती आहे.