आदेश न पाळल्यास कठोर कारवाईचे महसूल विभागाचे आदेश भगवान मंडलिक कल्याण : मानवी आरोग्याला घातक असलेला, इतर माशांच्या प्रजाती नष्ट करणारा आणि पर्यावरण संवेदनशीलतेला हानीकारक असणाऱ्या मागुर माशाचे ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात अवैधपणे मत्स्यपालन केले जात आहे. बंदी असूनही या मत्स्य प्रजातीचे उत्पादन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. भिवंडीजवळील तुळशी गावातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश बेलकरे यांनी याबाबत जिल्हाधिकारी आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडे केली आहे. भिवंडीजवळील कुंभारशीव, शिरगाव येथील नदी जवळील तळय़ांमध्ये मागुर माशांचे अवैधपणे उत्पादन घेतले जाते. या माशाला काळय़ा बाजारात भाव असल्याने अनेक मत्स्य व्यवसाय उत्पादक त्याला महत्त्व देत आहेत. जगभरात तसेच भारतातही मागुर मत्स्यशेतीवर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी आणली आहे. असे असूनही ठाणे जिल्ह्यातील ८० टक्के तळय़ांमध्ये मागुर मत्स्यपालन केले जाते. भिवंडीजवळील ज्या तळय़ांमध्ये मागुर माशाचे उत्पादन घेतले जाते. त्या तळय़ातील खराब पाणी यंत्राने उपसून ते बाजूच्या नदीत सोडले जाते. अशाप्रकारे नदीचे पाणी प्रदूषित करण्याचे काम उत्पादकांकडून सुरू आहे. प्रदूषित पाण्यामुळे नदीपत्रातील माशांच्या इतर प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे. ग्रामस्थांनी उपजीविकेसाठी नदीतील मासे पकडून आणले की नियमित भोजनातील त्या माशांना उग्र दर्प येतो. अशा माशांचे सेवन आरोग्याला हानीकारक आहे, असे बेलकरे यांनी महूसल विभागाच्या निदर्शनास आणले आहे. बहुतांशी मागुर माशाचे पालन वन विभागाच्या ८० टक्के जमिनींवर सुरू असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे म्हणणे आहे. वन विभागाने या जमिनी अशा उत्पादकांना कशा दिल्या असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ‘ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी एकच मत्स्य व्यवसाय विभाग आहे. मत्स्य विभागाकडे कर्मचारी वर्ग कमी आहे. कारवाईसाठी महसूल व इतर शासकीय विभागातील कर्मचारी उपलब्ध होतील यादृष्टीने प्रयत्न केले जातील. जिल्हास्तरीय समितीच्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल’, असे मत्स्य व्यवसाय विभागाचे साहाय्यक आयुक्त आनंद पालव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात जेथे मागुर माशाचे प्रजनन, पालन केले जाते. अशा ठिकाणी तक्रारींप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, असे पालव यांनी म्हटले आहे. ‘मागुर माशाच्या बेकायदा उत्पादन, पालनासंदर्भात महसूल विभाग, मत्स्य आणि वन अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रश्न कायमचा सोडवला जाईल. मागुर माशाचे उत्पादन ज्या तळय़ांमध्ये अथवा जागेमध्ये घेतले जाते, त्या शासकीय जमिनी, तळय़ांचा वापर परिसरातील ग्रामस्थ, आदिवासींच्या चांगल्या कामांसाठी कसा करुन घेता येईल याचा विचार केला जाईल. अशा अवैध मत्स्य पालनातून शासनाचा महसूल बुडतो. असे जलनायक स्नेहल दोंदे यांनी ग्रामस्थांबरोबरच्या पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितले. मागुर मासा पर्यावरणाला हानीकारक आहे. या माशाच्या उत्पादकांवर कठोर कारवाई करण्याचे जिल्हास्तरीय समितीला आदेश दिले आहेत. मागुर मत्स्यसाठा नष्ट करुन उत्पादकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. - राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे