कल्याण: कर वाढ नसलेला अर्थसंकल्प कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने मार्चमध्ये सादर केला आहे. मग अचानक नागरिकांवरील उपयोगकर्ता कचरा शुल्क वाढीचा विषय आला कोठुन, असा प्रश्न करत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी नागरिकांवरील कचरा शुल्क वाढ रद्द करावी अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नागरिकांच्या पुढाकारातून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.
अशाच प्रकारे शिंदे, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी, काही जागरूक नागरिकांनी पालिकेला पत्र लिहून ही कचरा शुल्क वाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. पालिकेकडून घराचे क्षेत्रफळ लहान असो की मोठे सरसकट यापूर्वीचा वार्षिक ६०० रूपये उपयोगिता कचरा शुल्काचा दर ९०० रूपये वार्षिक करण्यात आला आहे. या कराच्या प्रमाणात नागरिकांना शहर स्वच्छतेबाबत काही दिसून येत नाही. हा कर लावण्यामागील उद्देश काय, असा प्रश्न जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी केला आहे.
स्वच्छतेच्या नवीन चेन्नई कित्त्याप्रमाणे (पॅटर्न) कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक केली जाणार आहे. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जाणार नाही. पालिका हद्दीत दररोज ८५० टन कचरा तयार होतो. उंबर्डे, बारावे आणि डोंबिवलीत सुरू होणाऱ्या कचरा विल्हेवाट प्रकल्पांची क्षमता फक्त ६५० टन आहे. मग वाढीव कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार, असा प्रश्न म्हात्रे यांनी केला.पालिकेत फक्त ठेकेदार बदलले जातात. या प्रकल्पांची अंमलबजावणी करणारे अधिकारी, माणसे तिच आहेत. यापूर्वी दोन कंपन्यांनी शहर स्वच्छतेचे उपक्रम राबविले. शहर स्वच्छता आणि कामात कोणताही फरक पडलेला नाही, असे म्हात्रे यांनी सांगितले.
या कचरा शुल्क वाढीला ठाकरे गटाचे कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे, माजी नगरसेवक सुधीर बासरे, डोंबिवलीतील माजी नगरसेवक रवी पाटील, माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी विरोध करून यासंदर्भात पालिका प्रशासनाला पत्रे दिली आहेत. वाढीव कचरा शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.
मागील चार पाच वर्षापासून शासनाच्या विविध योजना, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून पालिका हद्दीत स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. शून्य कचरा मोहीम यशस्वी करण्यासाठी विविध यंत्रणा उभ्या केल्या आहेत. वाहने खरेदी केली आहेत. त्यामुळे शासन आदेशाप्रमाणे कर शुल्क वाढ केली आहे. नागरिकांंवरील शुल्क वाढीचा भार नाममात्र आहे. – अतुल पाटील उपायुक्त,घनकचरा.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मागील २५ वर्षात पालिकेत शहर स्वच्छतेच्या विचारातून दोन ठेकेदार येऊन गेले. त्यावेळी खासगी ठेकेदार असुनही शहर स्वच्छतेत कोणताही फरक पडला नाही. आता चेन्नई कित्त्याच्या नावाने स्वच्छतेचा नवीन प्रकल्प आणला आहे. ठेकेदार नवीन असला तरी त्याची अंंमलबजावणी करणारी माणसे, अधिकारी तेच आहेत. या लोकांकडून कितीही स्वच्छतेचे प्रकल्प राबविले तरी शहर स्वच्छतेत फरक पडण्याची शक्यता नाही. – दीपेश म्हात्रे जिल्हाप्रमुख,ठाकरे गट डोंबिवली.