कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार असलेल्या कल्याण लोकसभेतून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एकही पदाधिकारी पुढे येत नसल्याची चर्चा आहे. त्यातच ठाकरे गटातील चौथ्या फळीतील अयोध्या पौळ नामक महिला पदाधिकाऱ्याने स्वतःच ट्विट करत आपली उमेदवारी जाहीर केल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटात एकच गोंधळ उडाला. मुळात शिवसेनेत अशा प्रकारे स्वतःची उमेदवारी जाहीर करण्याचा प्रघात नाही. मात्र या ट्विटमुळे ठाकरे गटातील सावळा गोंधळ समोर आला. मात्र वरिष्ठांच्या दट्ट्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आल्याचे बोलले जाते. तसेच यानिमित्ताने ठाकरे गटात कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवण्यास कुणी इच्छुक नसल्याची चर्चा चौथ्या फळीपर्यंत पोहोचल्याचे बोलले जाते आहे.

अयोध्या पौळ या शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने अजूनही कल्याण लोकसभेतून आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. याठिकाणी सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई, केदार दिघे यांच्यासह इतर काही नावे चर्चेत होती. दुसरीकडे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेवर असलेली मजबूत पकड पाहता कल्याणमधून निवडणूक लढवण्यास मात्र कुणाचीही तयारी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

याच पार्श्वभूमीवर अयोध्या पौळ या ठाकरे गटाच्या दुय्यम पदाधिकाऱ्याने स्वतःच ट्विट करून आपल्याला कल्याण लोकसभेतून उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले. मात्र काही वेळातच हे ट्विट डिलीटही करण्यात आले. आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने #मशाल चिन्हावर शिवसेनेकडून #कल्याण लोकसभा लढवत आहे.. ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या #खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, वरुण सरदेसाई आणि साईनाथ दुर्गे यांचे आभार. असे पौळ यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले होते.

हेही वाचा – “बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना ठाकरे गटाने यापूर्वीच उमेदवारांची एक यादी जाहीर केली होती. त्यात कल्याणच्या जागेचा समावेश नव्हता. मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे. वरुण सरदेसाई यांच्यापासून सुषमा अंधारे, केदार दिघे यांच्याही नावाची चर्चा यापूर्वी रंगली होती. मात्र श्रीकांत शिंदे यांचे मतदारसंघात काम आणि पाठिंबा पाहता त्यांच्यासमोर पराभव पत्करावा लागेल ही भीती आहे. परिणामी कुणीही पुढे येत नाही. हीच चर्चा आता खालच्या फळीतही पोहोचल्याची चर्चा रंगू लागली आहे. तर स्वतःची उमेदवारी जाहीर करण्याचा प्रघात शिवसेनेत नाही. त्यामुळे या ट्विटनंतर ठाकरे गटातील सावळा गोंधळ समोर आला आहे.