ठाणे : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समर्पित मालवाहू मार्गासाठी (डब्ल्यूडीएफसी) भिवंडी येथील खारबाव परिसरात उभारण्यात आलेले १४ खांब आणि त्यावरील गर्डर पाडण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. संरेखन चुकल्यामुळे किंवा पाणथळ जमिनीमुळे खांब खचल्याने ते पाडण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाली. मात्र खांब पाडण्यामागचे कारण समर्पित मालवाहू मार्ग व्यवस्थापन आणि या प्रकल्प ठेकेदाराने स्पष्ट केले नाही.
पंतप्रधान गती शक्ती उपक्रमांतर्गत जेएनपीए ते उत्तर प्रदेशमधील दादरी असा पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग (डब्ल्यूडीएफसी) उभारण्यात येत आहे. हा मार्ग १ हजार ५०६ किलोमीटरचा आहे. कंटेनर, खत, अन्यधान्यासह इतर मालवाहतुकीसाठी हा मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाचे काम वैतरणा (सफाळे) पर्यंत पूर्ण झालेले आहे. त्यापुढे सफाळे ते जेएनपीए असा मार्ग उभारणीचे काम सुरू असतानाच, भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे खांब आणि त्यावर गर्डर उभारण्यात आले होते. यातील १४ खांब आणि त्यावरील गर्डर अचानक पाडण्यात आले असून त्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. हे खांब पाडतानाची चित्रफीत सौरभ राऊत यांनी समाजमाध्यावर प्रसारित केल्याने याची चर्चा सुरू झाली.
सफाळे ते जेएनपीए या मार्गाचे काम २०२५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु हे खांब आणि गर्डर पाडण्यात आल्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची मुदत आता हुकणार अशी चिन्हे आहेत. सफाळे ते जेएनपीए या मार्ग उभारणीत त्रुटी आढळून आल्यामुळे तो पाडण्यात आला असेल तर, त्या त्रुटी आधीच का निदर्शनास आल्या नाहीत असा सौरभ राऊत यांचा सवाल आहे. हा प्रकल्प निधीचा गैरवापर असून त्याचबरोबर प्रकल्पाच्या कालमर्यादेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, या सर्वाला जबाबदार कोण, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी यासंदर्भात समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग प्रकल्पाचे मुंबई उत्तर विभागाचे मुख्य व्यवस्थापक विकास कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, सफाळे -वैतरणा ते जेएनपीए दरम्यान चा या प्रकल्पातील पट्ट्याचे काम टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला देण्यात आली असून घडलेल्या प्रकाराबाबत टाटा प्रोजेक्ट लिमिटेड अथवा रेल्वे मंडळाकडूनच माहिती उपलब्ध होऊ शकेल असे सांगण्यात आले. तर, टाटा प्रोजेक्ट लिमिटेडचे अधिकारी नारायण यांनी याबाबत समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग विभागाचे अधिकारी माहिती देतील, असे स्पष्ट केले.