ठाणे : ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी रंगरंगोटीच्या माध्यमातून सुशोभिकरणाची कामे सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून पथके तयार करून त्यामार्फत रस्त्यालगत पडलेला राडारोडा उचलण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पंधरा दिवसांपुर्वी दिले होते. परंतु या आदेशाकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने बाळकुम भागातील रस्त्यालगत राडारोड्याचे ढिग कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवलीत बैठकांचा सपाटा, कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिका सुशोभिकरणाचा उपक्रम राबवित असून त्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील उड्डाणपुल,  अंतर्गत रस्त्यालगतच्या भिंती, तलाव परिसर तसेच अन्य भागामध्ये विविध संकल्पनेवर आधारित चित्र काढण्यात येत आहेत. या रंगरंगोटीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत असतानाच दुसरीकडे रस्त्यालगत राडारोडा फेकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रकारांमुळे शहर सौंदर्यीकरणाला बाधा निर्माण होत आहे. ही बाब ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याही निदर्शनास आली असून त्यांनी या प्रकारांना आळा घालण्यासाठी दक्षता पथके नेमण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. त्यापाठोपाठ पंधरा दिवसांपुर्वी त्यांनी बैठक घेऊन त्यात शहरातील रस्त्यांच्या कडेला ज्या-ज्या ठिकाणी राडारोडा नजरेस पडेल तो तातडीने उचलण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>> ठाणे : सार्वजनिक उद्यानात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा उचलण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर विशेष पथके तयार करण्यात यावी. या पथकाच्या माध्यमातून सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत दोन पाळीमध्ये शहरभर गाड्या फिरत राहतील आणि त्यांच्यामार्फत राडारोडा उचलला जाईल याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश त्यांनी बैठकीत दिले होते. या आदेशानंतरही बाळकुम येथून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्त्याक़डेला राडारोड्याचे मोठे ढिग दिसून येत असून याठिकाणी राडारोडा टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राडारोडा उचलण्याचे काम सुरु

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानंतर शहरातील मुख्य रस्त्यांसाठी तीन पथके तयार करण्यात आली असून त्यामार्फत राडारोडा उचलण्याचे काम सुरु झाले आहे. काही ठिकाणी पथके नेमण्याचे काम सुरु असून या पथकामार्फत उर्वरित भागातील राडारोडा उचलण्यात येईल, असे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.