भाद्रपद कृष्णपक्ष म्हणजेच पितृपक्ष काळात शुभकार्य करणे वाईट असते, असा समज अनेकांमध्ये असतो. मात्र, या प्रकारचे सर्व विचार आणि समज चुकीचे असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. पूर्वजांच स्मरण करण्यासाठी पितृपक्ष राखून ठेवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वजांचं आपण स्मरण करतो. त्यामुळे त्यांचे आशीर्वादच आपल्याला लाभणार आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणे वाईट नसल्याचे सोमण यांनी म्हटले आहे. गेल्या बुधवारपासून (६ सप्टेबर) पितृपक्ष सुरू झाला. भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हणतात. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी लोकांची श्रद्धा असते. पितृपक्षातील पंधरा दिवस वाईट व अशुभ असतात, असा काही लोकांमध्ये समज असतो. त्यामुळे लोक या पितृपक्षाच्या कालावधीत सोने, घर वगैरे मौल्यवान वस्तूंची खरेदी करत नाहीत. तसेच विवाह विषयक बोलणीही टाळतात. परंतु, या सर्व चुकीच्या समजुती आहेत, असे सोमण यांनी म्हटले आहे. याविषयी सोमण म्हणाले की, जर आपले पूर्वज या दिवसांत पृथ्वीवर येतात, अशी श्रद्धा असेल, तर या दिवसांत करत असलेल्या गोष्टींना पूर्वजांचा आशीर्वादच मिळणार आहे. पूर्वजांचा आशीर्वाद ही गोष्ट वाईट कशी असू शकेल? ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, घर किंवा जमीन जुमला मागे ठेवला अशा पूर्वजांना आपण पितृपक्षातील दिवसांत श्रद्धांजली वाहतो. त्यामुळे हे सर्व वाईट किंवा अशुभ कसे असू शकेल, असा प्रश्न सोमण यांनी उपस्थित केला.