ठाणे-पुणे महामार्गावरील शिळफाटा ते दहिसर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत गोदामामुळे या पट्ट्यामध्ये दररोज वाहतूक कोंडी होते. या गोदामासाठी या भागातील नाले, मोरया बुजवण्यात आले आहेत. प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थ यांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून येत्या महिनाभरात ही सर्व अतिक्रमणे हटवली जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांना सोमवारी दिले. या रस्त्यावरील मोऱ्या, डोंगरातून येणारे नैसर्गिक नाले गोदामांच्या बांधकामासाठी बंद करण्यात आले आहेत. या बांधकामांमुळे पावसाळ्यात थोडा पाऊस पडला तरी दहिसर दरम्यानचे रस्ते पाण्याखाली जातात. पूर परिस्थिती असेल तेव्हा या भागात चार ते पाच फुट पाण्याची पातळी रस्त्यावर असते. रस्त्यावरील भंगारावर पडलेले पावसाचे पाणी, यंत्रसामग्री मधील रसायन आजूबाजूच्या शेती, माळरानावर वाहून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिक व इतर पिकांची नासाडी होत आहे, अशी तक्रार कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार युवराज बांगर, आमदार पाटील, एमएमआरडीएचे अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे शीळफाटा ते दहिसर रस्त्यावरील गोदामे, बुजवलेल्या नाल्यांची पाहणी गेल्या आठवड्यात केली होती. या पाहणीमध्ये शीळफाटा ते दहिसर-मोरी पर्यंत लहान-मोठे एकूण रस्त्या खालून, परिसरातून गेलेले 32 नाले गोदामांच्या बांधकामांसाठी, भंगार साहित्य, अवजड सामग्री ठेवण्यासाठी बुजविण्यात आले आहेत, हे आमदार पाटील यांनी तहसीलदार बांगर यांना दाखवले. या पाहणीचा अहवाल तहसिलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. या बांधकामांमुळे पावसाळ्यात पाणी साचून 5 ते 6 तास वाहतूक कोंडी होते..अनेक वेळा अनधिकृत गोदामांना वारंवार आग लागून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. गोदाम मालक कचरा आजूबाजूच्या नाल्यात टाकतात. त्यामुळे नाल्यांचे प्रवाह बंद झाले आहेत. हे पाणी रस्त्यावर. गावातून, शेतामधून वाहत असल्यामुळे परिसरात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरते. या कचऱ्यामुळे आसपासच्या १४ गावातील शेतकऱ्यांची जमीन नापीक व्हायची वेळ आली आहे. या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी आमदार प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. सोमवारी या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली. त्यावेळी आमदार पाटील यांचे शीळफाटा दहिसर भागातील समस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शीळफाटा-दहिसर दरम्यानची अतिक्रमणे येत्या महिनाभरात हटवली जातील असे आश्वासन आमदारांना दिले.