ठाणे – शहापूर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कसारा येथील हद्दीत वन विभाग, महसूल आणि रेल्वे विभागाची जागा आहे. या जागांचे सीमांकन न झाल्याने तेथे रस्ते, विद्युत सुविधा, पाडयांना जोडणाऱ्या पायवाटा यांसारख्या सुविधा अद्याप नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नव्हती. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा मागणी देखील केली होती.
याची दखल घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच बैठकी घेतली, या बैठकीत त्यांनी या जागांचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर खातेफोड करावी. जेणेकरून तेथील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा देण्यात येतील, असे आदेश दिले.
जिल्ह्याच्या शहापूर आणि मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासकीय जागा आहे. यातील बहुतांश जागा या स्थानिक शेतकरी गेले अनेक दशक राखत असल्याने त्यांच्यात आणि प्रशासनामध्ये वाद देखील याच पद्धतीने कसारा गावात वन विभाग, महसूल आणि रेल्वे विभागाची जागा आहे. या जागांचे सीमांकन न झाल्याने तेथे रस्ते, विद्युत, पाऊलवाट आदी सुविधा देता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी पाठपुरावा देखील केला आहे.
गेले ५० वर्ष ग्रामस्थ या ठिकाणी राहत आहे. मात्र जागांचे सीमांकन न झाल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक पार पडली. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने या जागांची खातेफोड करावे. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करून द्याव्यात. तसेच प्रलंबित वनहक्क दावे तातडीने निकाली काढण्यात यावेत, अशा सूचना देखील यावेळी दिल्या.
सागरी किनारा क्षेत्रातील गावांमध्ये वन जमिनी अथवा कांदळवन भागातील स्मशानभूमीची माहिती गोळा करावी. या जागा नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. पेसा क्षेत्रात असलेल्या गावांचा स्वतंत्र प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवावे, असेही वनमंत्री नाईक यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.