विरार : विरारच्या नामांकित शाळेतून सोमवारी बेपत्ता झालेली चार मुले अखेर बुधवारी संध्याकाळी भाईंदर स्थानकात सापडली. नापास झाल्याने या मुलांनी गोव्यात नोकरी करण्यासाठी घर सोडले होते. या मुलांमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात ही चार मुले एकाच रहिवासी संकुलात राहात होती. त्यातील तीन मुले विरारमधील एकाच नामांकित शाळेत शिकत होती. या चार मुलांपैकी तीन मुले ही अल्पवयीन होती. सोमवारी सकाळी ही मुले अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या मुलांचा शोध सुरू केला होता. शेवटी सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत या मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले. बुधवारी संध्याकाळी ही चारही मुले भाईंदर स्थानकात सापडली. याबाबत माहिती देताना अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लिंगरे यांनी सांगितले की, ही मुले नापास झाल्याने घर सोडून गोव्याला जाणार होती. यांच्यातीलच एका मुलाच्या ओळखीने त्यांना गोव्यात नोकरी मिळणार होती. या मुलांचे जबाब घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.