निखिल अहिरे
ठाणे : तृतीयपंथी समाजाविषयी प्रचलित असलेल्या प्रतिमेला छेद देत या समाजातील अनेक तरुण समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. तृतीयपंथी तरुणांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी, रोजगार मिळविण्यात आणि भविष्याची वाटचाल करण्यासाठी कल्याणमधील ‘गरिमागृह’ मोलाची भूमिका बजावत आहे.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, राष्ट्रीय सुरक्षा संस्थान आणि किन्नर अस्मिता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या या गरिमागृहात तृतीयपंथी समाजातील नागरिकांना हक्काचा निवारा तर मिळतोच आहे, तसेच त्यांच्या उज्ज्वल भवितव्याविषयी येथे प्रयत्न केले जात आहेत.
तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जागतिक पातळीवर ३१ मार्च हा तृतीयपंथी ओळख दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या समाजातील अनेकजण वेगवेगळय़ा वाटा चोखाळताना दिसत आहेत. असे असले तरी त्यांना शिक्षण घेण्यात, रोजगार मिळविण्यात आणि हक्काचा निवारा शोधण्यात असंख्य अडचणी येतात. या तरुणांना हक्काच्या निवाऱ्याबरोबरच, शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थान आणि किन्नर अस्मिता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेतील हाजीमलंग मार्गावरील द्वारलीपाडा भागात गरिमागृह चालविण्यात येत आहे.
गरिमागृहात केवळ जिल्ह्यातील नव्हे तर नाशिक, जळगाव, अमरावती तसेच उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील १९ ते २५ वयोगटातील तृतीयपंथी राहत आहेत. यातील काही जण उल्हासनगर येथील सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या नेताजी महाविद्यालयात बारावीचे तर काही पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी गरिमागृहात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण वर्गदेखील आयोजित केले जातात. या ठिकाणी त्यांच्यासाठी विविध संथांच्यामार्फत आरोग्य शिबिरेदेखील घेतली जातात.
कौशल्य विकासाठी सामाजिक संस्थांचे योगदान
गरिमागृहातील तृतीयपंथींना शिवणकाम, दागिने घडविणे तसेच हस्तकला यासह विविध कौशल्य प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. यासाठी जनशिक्षण, वाण्या, अक्षशक्ती, अनुभूती यांसारख्या स्वयंसेवी संस्था मदत करत आहेत. तसेच यासाठी लागणाऱ्या काही यंत्रसामुग्रीची मदत ही अंबरनाथ येथील एएसबी कंपनीद्वारे करण्यात येत असल्याचे किन्नर अस्मिता संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.
तृतीयपंथी समाजातील अनेक तरुण शिक्षण आणि रोजगारासाठी प्रयत्न करत असतात. यातील काही तरुण गरिमागृहाशी संपर्क साधतात. त्यांच्या शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी येथे प्रयत्न केले जातात.– तमन्ना केणी, उपक्रम व्यवस्थापक, गरिमागृह, किन्नर अस्मिता संस्था, कल्याण
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2022 रोजी प्रकाशित
तरुण तृतीयपंथीयांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग ‘गरिमागृह’
तृतीयपंथी समाजाविषयी प्रचलित असलेल्या प्रतिमेला छेद देत या समाजातील अनेक तरुण समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात.
Written by निखिल अहिरे

First published on: 31-03-2022 at 02:55 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garimagriha path bright future ministry of empowerment social justice national security institute amy