ठाणे : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांमध्ये नागरिकांनी ५० लाखांपासून ते कोट्यावधी रुपयांची घरे खरेदी केली पण, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जाणवत असलेल्या पाण्याच्या तुटवड्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. अनेक संकुले टँकरने पाणी विकत घेत असल्यामुळे नागरिकांना महिन्याच्या देखभाल दुरूस्ती रक्कमेव्यरिक्त रक्कम भरावी लागत आहे. यामुळे पालिकेला पाण्याची देयके भरण्याबरोबरच नागरिकांवर टँकरच्या खर्चाचा दुहेरी भार पडत असल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. परंतु संपुर्ण शहरासाठी हे पाणी पुरेसे पडत नसून शहरात सद्यस्थितीत ३० ते ४० दशलक्षलीटर वाढीव पाण्याची गरज आहे. ठाणे शहराचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून शहरात आजही मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहीली आहेत. आजही येथे नवनवीन गृह प्रकल्प उभे राहत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे टंचाईची समस्या जाणवत असून त्यात विविध कारणांमुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होते. यामध्ये धरण क्षेत्रातील पाणी नियोजन, जलवाहिन्या दुरुस्ती, विद्युत पुरवठा खंडीत होणे, अतिवृष्टीमुळे पाणी उचल प्रक्रीयेवर होणारा परिणाम, अशा कारणांमुळे पाणी पुरवठा ठप्प होतो. पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. यामुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होते.
नागरिकांवर खर्चाचा भार
घोडबंदर भागात १५ दशलक्षलीटर वाढीव पाण्याची गरज आहे. या तुटवड्यामुळे अनेक संकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. पाणी बंद आणि त्यानंतरचे पुढील दोन दिवस संकुलांमध्ये टंचाईची समस्या निर्माण होते. नेहमीपेक्षा निम्मे पाणी संकुलांना पुढील काही दिवस मिळते. यामुळे संकुलातील रहिवाशी टँकरद्वारे पाणी विकत घेतात. पालिकेकडून विनामुल्य टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाते. पण, दिवसाला एकच टँकर दिला जातो. त्यामुळे नागरिक अडीच ते तीन हजार रुपये मोजून खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेतात. एका टँकरद्वारे दहा हजार लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा होता. यामुळे टँकरचा खर्चाची रक्कम रहिवाशांच्या मासिक देखभाल दुरुस्ती खर्चात जोडून दिली जाते. यामुळे नागरिकांना महिन्याला पाचशे ते १ हजार रुपये अतिरिक्त भरावे लागतात. पालिकेला पाण्याची देयके भरण्याबरोबरच नागरिकांवर टँकरच्या खर्चाचा दुहेरी भार पडतो.
कोणत्या भागाला किती पाणी जाते?
ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर म्हणजेच माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ११५ दशलक्षलीटर, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलीटर, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलीटर, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलीटर, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात ५३ दशलक्षलीटर, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात ४५ दशलक्षलीटर, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात ५५ दशलक्षलीटर, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ५१ दशलक्षलीटर असा एकूण ५८५ दशलक्षलीटर इतका प्रतिदिन पाणी पुरवठा होतो.
नवीन बांधकामांना पाणी कुठून देणार ?
सद्यस्थितीत संपुर्ण शहराला ३० ते ४० दशलक्षलीटर वाढीव पाण्याची गरज असून यासाठी मुंबई महापालिकेक़डे ५० दशलक्षलीटर वाढीव पाणी देण्याची मागणी ठाणे पालिकेने केली होती. आधीच उभ्या राहिलेल्या संकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असतानाच, त्यात नव्याने अनेक गृहसंकुले उभी राहत आहेत. या २० ते ३० माळ्याच्या इमारती आहेत. या इमारतीमधील घरांच्या किंमती ५० लाखांपासून ते पुढे कोट्यावधी रुपयांपर्यंत आहेत. निसर्गाच्या कुशीत घोडबंदर परिसर असल्याने नागरिक येथील घरांना पसंती देत आहेत. लाखो रुपये मोजून घरे घेत आहेत. पण, आधीच संकुलांमध्ये देण्यासाठी पुरेसे पाणी नसताना नवीन संकुलांना कुठून पाणी देणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
टँकरचे कंत्राट
दरवर्षी उन्हाळयात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होते. त्यावर मात करण्यासाठी पालिका खासगी टँकरने पाणी पुरवठा करते. यासाठी पालिका प्रभाग समिती स्तरावर प्रत्येकी दोन लाख तर महापालिका मुख्यालय स्तरावर १७ लाखांचे असे एकूण ३५ लाखांचे कंत्राट काढून ठेकेदाराची नेमणुक करते. शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी प्रति टँकरसाठी ११०० रुपये इतका दर दिला जातो. यामुळे ३५ लाखांच्या कंत्राटामध्ये तीन हजारहून अधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असते, अशी माहिती सुत्रांनी दिली.पाणी वळवावळवीघोडबंदर परिसरात १५ दशलक्षलीटर वाढीव पाण्याची गरज असल्यामुळे ही तुट भरून काढण्यासाठी काही भागांमध्ये पाणी कमी सोडले जाते. परंतु तेथील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर दुसऱ्या भागाचे पाणी वळवून तेथील पाणी पुरवठ्यात वाढ केली जाते. यामुळे ज्या भागाचे पाणी कमी झाले, तिथे आरडाओरड होते. एकूण घोडबंदरमधील पाणी वळवावळीचा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठ्यात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. परंतु दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. याशिवाय, पावसाळ्यात पाणी उपसा केंद्रात नदीतील कचरा अडकल्यामुळे पाणी बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. वर्षातील सात ते आठ महिने ही समस्या जाणवते. या काळात खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेतो. या बोरिंगचे चार तर, शुद्ध पाण्याचे चार असे एकूण आठ टँकरद्वारे पाणी विकत घेतो. प्रति टँकर अडीच हजार खर्च येतो. यामुळे मासिक देखभाल दुरुस्ती खर्चात वाढ होते, असे ग्रँड स्क्वेअर संकुलाचे पदाधिकारी जनार्दन लाड यांनी सांगितले.
घोडबंदर भागातील अनेक संकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. पालिकेकडून दररोज किती पाणी येणे अपेक्षित आहे आणि किती पुरवठा झाला, याची नोंद संकुलांकडून ठेवली जात आहे. काही दिवसांपुर्वी पालिकेला पत्र पाठवून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली आहे. मात्र, सातत्याने पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याने नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते, असे वाघबीळमधील ५४ गृहसंकुलांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वाघबीळ रेसिडेन्डस् ग्रुपचे सदस्य मुकेश ठोंबरे यांनी सांगितले.
ठाणे महापालिका क्षेत्रात ३० दशलक्षलीटर वाढीव पाण्याची गरज असून हे पाणी मिळावे यासाठी मुंबई महापालिकेकडे प्रयत्न सुरू आहेत. यासह भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण तसेच इतर स्त्रोतांमार्फत वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सदस्यस्थितीत शहरातील पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. – विनोद पवार, उपनगर अभियंता (पाणी पुरवठा), ठाणे महापालिका