लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: नाले आणि गटार व्यवस्थित साफ केली नाही आणि यामुळे पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर, प्रति घटनेमागे २० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. पावसाळ्यात गटारे तुंबल्यास सफाईचे काम ठेकेदाराला करावे लागेल. त्याचा वेगळा मोबदला दिला जाणार नसून त्यासाठी २५ टक्के रक्कम राखून ठेवून ती पावसाळ्यानंतर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिका हद्दीत सुमारे ३०८ किमी अंतराचे १२९ छोटे व मोठे नाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई करण्यात येते. पावसाळ्यात पाणी साठू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. वर्तकनगर प्रभाग समिती वगळता इतर आठही प्रभाग समितींमध्ये नालेसफाईचे काम सुरू झाली आहेत. वर्तकनगरमधील कामे लवकरच सुरू होणार आहेत. या कामांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त बांगर यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना महत्वाच्या सुचना केल्या आहेत. ही सर्व कामे करताना सर्व विभागांनी समन्वय ठेवावा आणि ३१ मे च्या आधी नाले सफाई पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. नाले सफाई करताना त्यात जलवाहिन्या, वीज वाहिन्यांचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आणखी वाचा-ठेकेदारांच्या मनमानीमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेत नालेसफाई कामांची नव्याने निविदा प्रक्रिया

पाणी साचणाऱ्या सखल भागातील नाले, तसेच पावसाळी पाण्याचा निचरा करणारी गटारे व्यवस्थित स्वच्छ केली जावीत. काही गटारांच्या सफाईचा निविदेतच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी साचण्याची पारंपरिक ठिकाणे शोधून तेथील सर्व बाजूंच्या गटारांची सफाई केली जावी. त्यावर संबंधित प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष असावे, असे निर्देशही त्यांनी दिले. प्रभाग क्षेत्रात कार्यकारी अभियंता, उपमुख्यस्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक यांची नालेसफाईच्या कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे. यंदा नाले सफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी छायाचित्र आणि चित्रीकरण यांच्या सोबतच ड्रोनचाही वापर केला जात आहे. सर्व नाल्यांचे सफाई पूर्व ड्रोन चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सफाई नंतरचेही चित्रीकरण केले जाणार आहे. देयके अदा करण्यापूर्वी दोन्ही परिस्थितीची तुलना केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा- ठाण्यातील सेवा रस्त्यांवर वाहनतळाची मोफत सुविधा, ठाणे महापालिकेची योजना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाधानकारक पद्धतीने नाले सफाई केली तर देयके थकीत राहणार नाहीत, याबद्दल ठेकेदारांनी खात्री बाळगावी. परंतु कामाचा दर्जा सर्वोत्तम नसेल तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नाल्यातील काढलेल्या गाळाची ४८ तासांच्या आत विल्हेवाट लावणे, काढलेल्या गाळावर जंतुनाशक व दुर्गंधीनाशक यांची फवारणी करणे आवश्यक आहे. तसे केले नाहीतर प्रती घटना दंड आकारण्याची तरतूद निविदेत करण्यात आली आहे. त्याचबरोबर, नाले सफाई करणाऱ्या कामगारांना गमबुट, मास्क, हातमोजे पुरवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, पावसाळ्यात नाल्यातील अडथळे काढणे, वनस्पती व इतर वाहून आलेल्या वस्तु काढणे, पाणी वाहते ठेवणे ही कामे करण्यात येतील. पावसाळा संपल्यानंतर वनस्पती, केर कचरा, प्लास्टिक काढणे आणि नाले स्वच्छ ठेवणे या कामाचा समावेश निविदेत करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उथळसर, मानपाडा, कळवा या विभागातील नालेसफाईसाठी आवश्यक तेथे प्लाटून यंत्राचा वापर करण्यात येत आहे. तसेच इतर विभागात नाले सफाई करताना जेसीबी पोकेलन यंत्राद्वारे नाल्यामध्ये सोडल्या जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.