अंबरनाथ: मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या उसाटने गावाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून माकडानी हैदोस घातला होता. गावाच्या परिसरात शिरणे, नासधूस करणे, चावा घेणे असे प्रकार या माकडाकडून केले जात होते. वन विभागाने माकडाच्या अटकेसाठी पिंजरे लावले होत. मात्र हे माकड त्यात अडकत नव्हते. अखेर दोन दिवसांपूर्वी शनिवारी या माकडाला जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याची मलंगगडाच्या जंगलात मुक्तता करण्यात आली आहे.
अंबरनाथ तालुक्यात मलंगगडाची मोठी डोंगररांग आहे. निसर्गसंपदेसोबतच येथे वन्य प्राण्यांचा वावर आहे. या जंगलात विविध भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसून आले होते. जानेवारी, फेब्रुवारी नंतर या डोंगरावरील हिरवेपणा कमी होऊ लागतो. त्याचवेळी शिकारीसाठी अनेक जण हा डोंगर पेटवण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी प्राण्यांसाठी आवश्यक खाद्य आणि पाणी कमी होत जाते. त्यामुळे वन्य प्राणी शहराकडे आपला मोर्चा वळवतात.
यापूर्वीही बिबटे, माकडांचे कळप शहराकडे आल्याचे दिसून आले होते. काही दिवसांपूर्वी मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या उसाटने गावाच्या हद्दीत माकडांची एक टोळी वावरत असल्याचे दिसून आले होते. यातील एक माकड हे घरांवर उड्या मारत, घरावरील साहित्याची नासधूस करत होते. काही व्यक्तीवर हल्ला करणे, मुलांना चावा घेणे असे प्रकारही माकडाकडून होत होते. त्यामुळे ग्रामस्थानी स्थानिक ग्रामपंचायत आणि वन विभागाकडे तक्रार केली होते. या माकडाला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न सुरू होते.
मात्र माकड दररोज जागा बदलत असल्याने त्याला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर होते. अखेर या माकडाला शनिवारी वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकविण्यात वन विभागाला यश आले आहे. बदलापूर वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संजय धारवाने यांच्या मार्गदर्शनाखाली आंभे मंडळ अधिकारी विठ्ठल दरेकर यांच्या पथकाने या चावक्या माकडाला जेरबंद केले आहे. पकडलेल्या माकडाची वैदयकीय तपासणी करून त्याला मलंगगडच्या निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे.
डोंगराळ भागात पाणी आणि अन्न उपलब्ध नसल्याने वन्य जीव मानवी वस्तीत प्रवेश करत आहेत. वाढत्या जंगलातील अतिक्रमणांमुळे वन्य जीव मानवी वस्तीत प्रवेश करताना दिसून येत आहे. उसाटने गावात प्रवेश केलेलमुळे या माकडांनी तब्बल आठ पेक्षा अधिक बालकांना चावा घेतला होता. आता अन्य कुठे वन्य जीव आहेत का, गावांमध्ये याचा शोध वन विभागाचे जवान घेत आहेत.