ठाणे – वटपौर्णिमेला पूजेसाठी वडाची फांदी तोडू नका असे आवाहन दरवर्षी पर्यावरण प्रेमी संस्थांकडून केले जाते. असे असले तरी वडाची छाटणी काही थांबलेली दिसत नाही. वटपौर्णिमेनिमित्त यंदाही ठाणे शहरातील बाजारात मोठ्याप्रमाणात वडाच्या फांद्यांची विक्री सुरु असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.

वटपौर्णिमा या सणाच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. शहरात पारंपरिकरित्या झाडाभोवती फेऱ्या मारून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. मात्र सध्या अनेक महिला वडाच्या झाडाच्या फांद्या विकत घेऊन घरातच पूजा करत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे दरवर्षी वडाच्या झाडांच्या फांद्यांची मोठ्या प्रमाणात छाटणी केली जाते. पर्यावरणप्रेमी संस्था आणि कार्यकर्ते दरवर्षी याविरोधात जनजागृती करत असले तरी फांद्या तोडण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्राहकांचा उत्साह आणि मागणी पाहता विक्रेते फांद्या तोडून बाजारात विक्रीसाठी आणतात. जोपर्यंत ग्राहक खरेदी करत आहेत, तोपर्यंत विक्रेते फांद्या विकायला येणारच. त्यामुळे फांद्या विकत घेणाऱ्यांनीच यावर विचार करायला हवा, असे स्पष्ट मत पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी व्यक्त केले. निसर्गालाच तोडून त्याचीच पूजा करणे ही कोणती संस्कृती? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यंत्रणांनी कारवाई विक्रेत्यांवर करण्याऐवजी फांद्या खरेदी करणाऱ्या नागरिकांवर करायला हवी. खरेदी थांबली तर छाटणी आपोआप थांबेल असे मतही जोशी यांनी व्यक्त केले.