बदलापूरः गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील तापमान वाढत असून त्यात आर्द्रता वाढल्याने उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे विजेचा वापर वाढला असून परिणामी महावितरणावरील वीज पुरवठ्यावरही ताण वाढला आहे. परिणामी शुक्रवारपासून अंबरनाथ आणि बदलापुरात भारनियमन सुरू केले जाणार आहे. चक्राकार पद्धतीने रात्री ११ ते १ या दरम्यान काही भागात विजेचा पुरवठा खंडीत केला जाणार आहे. त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथकरांना भार नियमनाचे चटके बसणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात तापमानापात वाढ होत असल्याचे चित्र आहे. सोबतच वातावरणातील आर्द्रतेत वाढ झाल्याने प्रत्यक्षात असलेल्या तापमानापेक्षा अधिकच्या तापमानाचा अनुभव येतो. सध्या जिल्हात सरासरी ३० अंश सेल्सियस तापमान असून दमटपणामुळे त्यापेक्षा तीन ते चार अंश सेल्सियस तापमान असल्याचे जाणवते. रात्रीही वातावरणात दमटपणा असून त्यामुळे रात्र घामांच्या धारांत निघते. अशावेळी पंखे आणि वातानुकूलित यंत्रणेचा वापर वाढला असून पर्यायाने विजेचा वापरही वाढला आहे. या वापरामुळे महावितरणाच्या यंत्रणेवर भार येतो आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात लोकसंख्या झपाट्याने वाढली असून विजेचे ग्राहकी वाढले आहे. मात्र त्याचवेळी विजेचा पुरवठा जुन्याच क्षमतेचा आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे वीज वितरण यंत्रणेवर भार येतो आहे.

हेही वाचा >>> तापमान वाढू लागले अन् त्यात अघोषित भारनियमन; ठाण्यात उकाड्यामुळे नागरिक हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणामी यंत्रणा ठप्प होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जेव्हा वीजेची मागणी सर्वोच्च असते, अशावेळी विजेचा पुरवठा अखंडीत रहावा यासाठी महावितरणाने चक्राकार पद्धतीने भार नियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ११ ते १२ किंवा एक या दरम्यान चक्राकार पद्धतीने वीजेचा पुरवठा खंडीत केला जाणार आहे. मोरिवली उपकेंद्रातून पुरवठा होणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर या शहरांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे विजेचा पुरवठा करण्यात असमर्थ ठरणाऱ्या महावितरणावर नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे. आधीच वीज असूनही घामांच्या धारात रात्र काढावी लागत असतानाच ऐन झोपेच्या वेळी वीज पुरवठ खंडीत झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून तापमानात घट येईपर्यंत आणि मागणीत घट येईपर्यंत हा निर्णय लागू राहणार असल्याची माहिती महावितरणाच्या वतीने देण्यात आली आहे.