कल्याणजवळील विठ्ठलवाडी स्टेशनवर २५ वर्षांच्या तरुणाने ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येपूर्वी तरुणाने फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केला असून यात त्याने प्रेयसीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

कल्याणजवळील मोहने परिसरात राहणाऱ्या राजेश भंडारी (वय २५) या तरुणाचे नववी इयत्तेत असल्यापासून एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबियांनाही प्रेमसंबंधांची माहिती होती. या वर्षाच्या अखेरीस दोघांचे लग्नही होणार होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता.

२७ जुलैला राजेश भंडारीला त्याच्या प्रेयसीने विठ्ठलवाडी स्टेशनवर भेटायला बोलावले. विठ्ठलवाडी स्टेशनवर दोघांमध्ये भांडण झाले. अखेर रेल्वे पोलिसांनी दोघांनाही स्टेशनबाहेर जायला सांगितले. प्रेयसी निघून गेल्यावर राजेशने रेल्वे ट्रॅकवरुन फेसबुक लाईव्ह केले. यात त्याने प्रेयसीमुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले. ‘त्या मुलीने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले असून तिच्यामुळे मी आता आत्महत्या करत आहे’, असे त्याने यात म्हटले आहे. आत्महत्येपूर्वी त्याने भावाला आणि एका मित्रालाही फोन केला होता. यानंतर त्याने ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे.