कल्याण-डोंबिवली पालिकेतील आडवली ढोकळी प्रभागाचे भाजपा समर्थक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी शनिवारी कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कुणाल पाटील यांनी आव्हाड यांची भेट घेतल्याने ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कुणाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहोत असे सांगितले. आपल्यासोबत इतर आठ ते नऊ नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे पाटील म्हणाले.
२०१५ च्या पालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी भाजपला समर्थन दिले होते. आता होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत पाटील यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. “मंत्री जितेंद्र आव्हाड हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे आम्हाला यापूर्वी मोलाचे मार्गदर्शन झाले आहे. कल्याण डोंबिवली शहरांचा काय विकास झाला आहे हे आपण पाहतच आहोत. या शहरांचा विकास होण्यासाठी मंत्री आवास यांच्यासारखे नेतृत्व या दोन्ही शहरांना हव आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कुणाल पाटील यांनी सांगितले.
दोन महिन्यापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिकेतील भाजपचे पाच नगरसेवक शिवसेनेत गेले. दोन दिवसापूर्वी पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजपा नगरसेवक विशाल पावशे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता कुणाल पाटील यांनी भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक पातळीवर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.