एकीकडे राज्यात आषाढी एकादषीचा उत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे मुस्लीम समाजामध्ये बकरी ईदचाही उत्साह दिसून येत आहे. दोन्ही समाजांकडून हा दिवस उत्साहात साजरा केला जात असताना कल्याणमध्ये मात्र यानिमित्ताने काहीसा तणाव निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवसेनेकडून, अर्थात आता झालेल्या शिंदे गट व ठाकरे गट या दोन गटांकडून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन केलं जात आहे. यानिमित्ताने बॅरिकेट्स ओलांडून काही कार्यकर्त्यांनी किल्ल्यात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आलं.
आज सकाळीच शिंदे गट व ठाकरे गटाचे कार्यकर्ते दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर आंगोलन करू लागले. या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी आधीच सतर्कतेचा उपाय म्हणून दुर्गाडी किल्ला परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. बॅरिकेट्स लावून किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे शिवसैनिकांनी किल्ल्याच्या बाहेरच घंटानाद आंदोलन सुरू केलं.
३८ वर्षांपासून चालू आहे आंदोलन!
या आंदोलनाला गेल्या ३८ वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही धर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी इदच्या दिवशी या ठिकाणी मुस्लीम धर्मीय मोठ्या प्रमाणावर प्रार्थना करण्यासाठी जमतात. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या काळात किल्ल्यावर इतरांना प्रवेश बंद ठेवण्यात आला. १९८६ साली धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाच्या शिवसेनेने किल्ल्याच्या बाहेर घंटानाद आंदोलन सुरू केलं. तेव्हापासून दरवर्षी किल्ल्याच्या परिसरात हे आंदोलन शिवसेनेकडून केलं जातं.
यावेळी शिवसेनेत फूट पडून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाल्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते किल्ल्याच्या परिसरात जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे. या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करतानाच पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी काही आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.