उल्हासनगर : उल्हासनगरच्या वडोल भागात वालधुनी नदीवरच्या पुलासाठी स्थानिकांना मोठा संघर्ष करावा लागला. आता हा पूल कसाबसा तयार झाल्यानंतर दोन वर्षांपासून या पुलाला जोडणारा वडोल गाव ते गुलराज टॉवर हा रस्ता तयार होत नसल्याने स्थानिकांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. स्थानिक शाळेचे व्यवस्थापन, नागरिक, पालक अशा सर्वांनी उल्हासनगरात आंदोलन सुरू केले असून पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातो आहे.
एकीकडे शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे खड्ड्यात पडून जखमी होऊन प्रवास करणाऱ्या आणि वेळेप्रसंगी जीवाला मुकणाऱ्या उल्हासनगर वासियांच्या नशिबी रस्त्यांबाबत दुरावस्थाच आली आहे. तर दुसरीकडे रस्ताच न बांधल्याने नागरिकांवर उपोषणाची वेळ आली आहे. उल्हासनगर पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात सध्या संतापाची लाट आहे.
उल्हासनगरच्या रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरून वालधुनी नदी वाहते. या नदीच्या पल्याड वडोल नावाचे गाव आहे. महापालिकेत मोडणाऱ्या या गावाच्या समस्या सोडवण्याकडे पालिका प्रशासनाने कायमच दुर्लक्ष केले आहे. वालधुनी नदीवरचा पूल मोडकळीस आल्यानंतर तो पाडून नवा पूल तयार करण्याच्या काळात वडोलवासियांना मोठा संघर्ष करावा लागला. जुना झालेला येथील पूल सप्टेंबर २०१६ साली कोसळला. त्यानंतर येथे नव्या पुलाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या. २०१७ मध्ये या पुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले. मात्र हे काम निकृष्ट होत असल्याने स्थानिकांनी याला विरोध केला. त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा या पुलाचे काम सुरू झाले. काही वर्षांपूर्वी हा पूल तयार झाला. मात्र त्याला जोडणारा रस्ता तयार झाला नव्हता.
या पुलापासून गुलराज चौकापर्यंतच्या कामासाठी २०२२ वर्षात काम सुरू करण्यात आले होते. २ कोटी रूपयांच्या खर्चातून हे काम होणार होते. त्यासाठी मार्गातील काही अतिक्रमणे हटवण्यात आली. मात्र तरीही या रस्त्याचे काम दोन वर्षे पूर्ण होऊ शकलेले नाही. मात्र त्याचवेळी या रस्त्याच्या कंत्राटदाराला बिल अदा करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याविरूद्ध स्थानिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बुधवारी या आंदोलनात शेजारच्या शाळेतील पालक, शाळेचे व्यवस्थापकीय कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे. रस्त्याअभावी येत्या पावसाळ्यातही येथील रहिवासी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची फरफट होणार आहे.
चौकटः याबाबत उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाशी संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले. मात्र संबंधित कामाच्या कंत्राटदाराला जितके काम तितकेच बिल अदा केले आहे अशी माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे. तर आंदोलनानंतर पालिका प्रशासन या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी हालचाल करत असल्याचेही समजते आहे.