अंबरनाथः राज साहेब ठाकरेंनी यांना सर्व काही दिले. आता काय राज साहेबांची खुर्ची हवी होती का, असा थेट सवाल मनसेचे पदाधिकारी उपस्थित करत आहेत. अंबरनाथ मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेतील (शिंदे गट) प्रवेशावर जोरदार टीका केली आहे. या पक्ष प्रवेशानंतर अंबरनाथ शहरातील मनसैनिक आक्रमक झाले आहेत. जे शिवसेनेत गेले ते ठेकेदार होते, आता पक्षात राहिलेले खरे शिलेदार आहेत अशीही टीका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षांतराचा स्फोट अंबरनाथच्या राजकारणात नवे वादळ घेऊन आला आहे. मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.

या पक्ष प्रवेशानंतर सुरूवातीला शहरातून प्रतिक्रिया आली नव्हती. शहरातील मनसेचे पदाधिकारी शिवसेनेत जाण्याची चर्चा होती. मात्र त्यावर थेट कुणी बोलताना दिसत नव्हते. मात्र सायंकाळी प्रवेश पार पडल्यानंतर मनसेैनिक शहरातील कार्यालयात जमले होते. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होते. यावेळी पक्ष सोजून गेलेल्यांविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर अनेक पदाधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या.

यावेळी बोलताना मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी या प्रवेशावर संताप व्यक्त करताना, जे गेले ते वॉर्डाच्या नव्हे, तर स्वतःच्या विकासासाठी गेले आहेत, अशी खरमरीत टीका केली. तर बंडू देशमुख यांनी पुढे स्पष्ट शब्दांत हल्ला चढवला. शिवसेनेत गेले ते ठेकेदार, मनसेत राहिले ते खरे शिलेदार. तीन गेले तरी तीनशे यायला तयार आहेत. यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही. यांना शहराध्यक्ष केले, शहर कमिटी त्यांच्या हातात होती, राजसाहेब ठाकरे, माजी आमदार राजू पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी यांचा थेट संपर्क होता.

मग नाराजी कसली, असा प्रश्न देशमुख यांनी बोलताना उपस्थित केला आहे. तर यांनी पक्षात राहून स्वतःचाच विकास केला. त्यांच्या जाण्याने पक्षाला खूप फरक पडणार नाही, अशीही प्रतिक्रिया यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. या प्रवेशामुळे शिवसेनेला स्थानिक पातळीवर पालिका निवडणुकीत अधिक बळकटी मिळू शकते, मात्र मनसेत उरलेले कार्यकर्ते अधिक निष्ठावंत आणि लढाऊ असल्याचा पक्ष नेतृत्वाचा दावा आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अंबरनाथमध्ये मनसे आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.