ठाणे : ठाणे येथील कोलशेत भागातील पार्कसिटी गृहप्रकल्पाच्या परिसरातील सुमारे २०.५ एकर जागेवर ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ची उभारणी करण्यात आली असतानाच, त्यापाठोपाठ आता याच परिसरात पक्षीपालनगृह उभारणीचा निर्णय घेतला आहे. यानुसार पक्षीपालनगृह ५.३ हेक्टर जागेवर विकसित केले जाणार असून यासाठी राज्य शासनाने १० कोटींचा निधी मंजुर केला आहे. यामुळे पक्षीपालनगृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे शहरातील नागरिकांना मनोरंज तसेच विरंगुळ्याचे नवे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महापालिका वेगवेगळी उद्याने, खाडी किनारी चौपाटीची उभारणी करत आहेत. यातूनच कोलशेत भागातील सुमारे २० एकर जागेवर ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ची उभारणी करण्यात आली असूनच याच भागात टाऊन पार्कच्या माध्यमातून मत्स्यालय, तारंगण, विज्ञान केंद्र आणि सेंद्रीय वनस्पती प्रकल्प उभारणीचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यासाठी पालिका प्रशासनाने कोलशेत भागातील जागेचा आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यापाठोपाठ आता या भागात पक्षीपालनगृह उभारणीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
या प्रकल्पाच्या उभारणीकरिता निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी ठाणे महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाने या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजुर करून तसा शासन निर्णय काढला आहे.
ठाणे येथील कोलशेत भागात ५.६८ हेक्टर इतकी शासकीय जमीन असून यापैकी ५.३ हेक्टर जागेवर पक्षीपालनगृह विकसित करण्यात येणार आहे. यापुर्वी विविध पक्षी पाहण्यासाठी ठाणेकरांना इतर राज्यात जावे लागत होते. मात्र, आता ठाणेकरांना ही संधी ठाण्यातच उपलब्ध होणार आहे. ठाणेकर नागरीकांना निसर्गाबद्दल ओढ निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना पक्षांबद्दल ज्ञान, माहिती, प्रत्यक्ष पाहण्याची, निरीक्षण आणि अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या पक्षीपालनगृहात उद्यान विकसीत करणे, पक्षांचे पिंजरे तयार करणे आणि इतर कामे करण्यात येणार आहेत. तसेच वरील बाजूस मोठी जाळी बसविली जाणार आहे आणि आतमध्ये विविध प्रजातीचे पक्षी एकाच छताखाली पाहण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे. हे पक्षीपालनगृहाच्या निगा देखभालीचे आणि त्याच्या संचलनाचे काम खाजगी संस्थेला दिले जाणार आहे. या संस्थेला पक्षी आणणे, त्यांचे खानपान बघणे, त्यांच्यावर उपचार करणे, अशी कामे करावी लागणार असून त्यासाठी महापालिकेचा एकही रुपया खर्च केला जाणार नाही. तसेच याठिकाणी प्रवेश शुल्क आकारले जाणार असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा महापालिकेला कसा मिळेल, या दृष्टीकोनातून पालिका प्रस्ताव तयार करीत असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे.