ठाणे : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकतेच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांना एक पत्र दिले आहे. या पत्रामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीने मोटार वाहन कायदा, कलमअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच त्यांच्यावर हा गुन्हा का दाखल करावा, याचे कारणही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर जितेंद्र आव्हाड विरुद्ध आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला असा सामना रंगला आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये आरोपत्यारोप झाला होता. त्यातच आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकतेच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांना एक पत्र देऊन आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीसाठी नेहमीच काहीतरी स्टंट करीत असतात. प्रसार माध्यमांसमोर येऊन स्टंट करणे आणि टिव्हीवर झळकणे यासाठी ते धडपड करताना दिसतात. सोमवार, २६ मे रोजी जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीसाठी स्वतः रिक्षा चालवित थेट ठाणे महापालिका मुख्यालयात आले. रिक्षा चालविण्यासाठी आवश्यक असलेले वाहन परवाना, ऑटो रिक्षा परमिट, चालक ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे त्यांच्याकडे नसताना देखिल त्यांनी ऑटो रिक्षाचे स्टेअरींग हातात घेऊन बेकायदेशीरपणे रिक्षा चालवित रस्त्यावरुन ये-जा करणा-या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केला आहे. जर त्यावेळी एखादा अपघात घडला असता तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित राहत आहे, असे परांजपे यांनी पत्रात म्हटले आहे. संबंधीत प्रकरणी गंभीर दखल घेऊन केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी बेकायदेशीरपणे ऑटोरिक्षा चालविणा-या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीने मोटार वाहन कायदा, कलम 1988 (Motor Vehicles Act, Section 3/181) आणि मोटार वाहन कायदा, कलम 66/192A अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.