ठाणे : पहलगाममधील हल्ला हा देशावर झालेला हल्ला आहे. सर्वजण सरकारच्या पाठीशी आहेत. विरोधी पक्षही सरकारच्या पाठीशी आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवायचे आहे की, पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. नुसता सर्जीकल स्ट्राईक घडवून आता काही होणार नाही, त्यासाठी पाकीस्तानला चोख उत्तर द्यावेच लागेल, असे ते म्हणाले.

ठाण्याच्या पाचपखाडी भागातील गणेशवाडी येथे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानीचे मंदिर उभारले असून या मंदिरातील तुळजाभवानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आली. याठिकाणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उपस्थिती लावून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहलगाम येथे नागरीकांवर झालेल्या हल्ल्यात ज्या नागरिकांचा मृत्यु झाला, त्यांचे कुटूंब त्या घटनेच्यावेळेस त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे त्यांचे कुटूंब जे काही सांगत आहेत, त्यावर विश्वास ठेवायलाच हवा, असे मत जंयत पाटील यांनी व्यक्त केले. आजवर सैनिकांवर हल्ले होत होते. परंतु आता नागरिकांवर हल्ला करण्यात आला आहे. पहलगाम येथे अतिरेक्यांनी नागरीकांवर हल्ला करणे, हीच फार मोठी घटना आहे. अतिरेकी तिथे आले, गोळीबार करुन निघून गेले, ३०० किमी अंतर कापून अतिरेकी पळून जातात, ते अद्यापही सापडू शकत नाहीत, ही अतिशय चिंतेची बाब आहे, असेही ते म्हणाले. पहलगाम येथे नागरीकांवर हा हल्ला नसून तो भारतावर झालेला हल्ला आहे. अतिरेक्यांनी जो निर्दयीपणा दाखवला आहे, त्यासाठी पाकीस्तानला आता धडा शिकवावाच लागणार आहे, असेही ते म्हणाले. सर्वजण सरकारच्या पाठीशी आहेत. विरोधी पक्षही सरकारच्या पाठीशी आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवायचे आहे की, पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा. तसेच नुसता सर्जीकल स्ट्राईक घडवून आता काही होणार नाही, त्यासाठी पाकीस्तानला चोख उत्तर द्यावेच लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

पालकमंत्री बाबतचा वाद हा सहा महिन्यांपासून सुरु आहे. सरकाराला हा प्रश्न अद्यापही सोडविता आलेला नाही. सरकारमधील तीन पक्षातील अंतर्गत संबध कसे आहेत, हेच यावरुन स्पष्ट होत आहे. त्यावर आता काय बोलायचे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर लक्ष घालून १ मेच्या दिवशी नवी सुरवात करावी, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

इतरांनी बोध घ्यावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुळजा भवानी मातेचे हे उत्तम मंदिर उभारण्यात आले आहे. तुळजापुर मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आव्हाड यांनी पुढाकार घेतला, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. जितेंद्र आव्हाड यांनी रितसर परवानगी घेऊन मंदिर उभारले आहे. त्यामुळे धर्माचे, देवाचे मंदिर बांधा पण, त्यासाठी परवानगी घ्या, असा बोध आव्हाड यांनी इतरांना दिला आहे. विखे पाटील यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता, कोणत्या कारणासाठी गुन्हा दाखल झाला याची माहिती नसल्याचे सांगत तो विषय आधी समजून घ्यावा लागणार आहे, त्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.