tvlog02अभिनय प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या ठाण्यातील प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी या संस्थेचा १५ वा वर्धापन दिन रविवारी १० मे रोजी सकाळी १० वाजता गडकरी रंगायतनमध्ये साजरा होत आहे. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विनोद इंगळहळ्ळीकर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून अभिनेते मकरंद अनासपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी पाच बालनाटय़ेही सादर केली जातील. संस्थेच्या वाटचालीवर आधारित विशेष चित्रफीतही या वेळी दाखविण्यात येणार आहे. त्यानिमित्त अ‍ॅकॅडमीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी..  

प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ठाणे</strong>

व्यक्तीने एखादी का होईना कला शिकावी, असे म्हणतात, कारण प्रत्येकाला कलेत पारंगत होता येत नसले तरी कलासाधनेतून आनंद मात्र नक्की मिळतो. औरंगाबादमध्ये नटवर्य लक्ष्मणराव देशपांडे यांच्याकडून रीतसर नाटय़कलेचे शिक्षण घेतलेल्या अरुंधती भालेरावांचेही काहीसे असेच झाले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या मनातही अभिनेत्री होण्याची खूप इच्छा होती. मात्र पुढे लग्न, मूल आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अभिनयाचे गुण असूनही त्यांना सिने-नाटय़ क्षेत्रात प्रवेश करता आला नाही. मात्र १५ वर्षांपूर्वी ठाण्यात आल्यावर त्यांनी आपल्यातील या गुणांना वाव देण्यासाठी मुलांसाठी अभिनयाचे धडे देणारे प्रशिक्षण वर्ग भरविण्यास सुरुवात केली. त्यासाठी प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी नावाची संस्था स्थापन केली. ‘अभिनयातून व्यक्तिमत्त्व विकास’ ही त्यांची संकल्पना पुढे सर्वत्र रूढ झाली. ठाण्यात येण्यापूर्वी नागपूरला असताना त्यांच्या गाठीशी शाळेत नाटय़कला शिकविण्याचा अनुभव होताच. त्यामुळे त्यांच्या अभिनय वर्गाना चांगला प्रतिसाद मिळू लागला. सुरुवातीच्या काळात त्या घरातच प्रशिक्षण वर्ग घेत होत्या. पुढे २००३ पासून नौपाडा विभागातील बेडेकर विद्यामंदिरमध्ये त्यांनी नियमितपणे अभिनयातून व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. अभिनयाचा हा मामला हौसेमौजेचा असला तरी त्याला शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची जोड देण्याचा कटाक्ष ‘प्रारंभ’ने सुरुवातीपासूनच पाळला आहे.   
स्वतंत्र अभ्यासक्रम-मर्यादित संख्या
‘प्रांरभ’च्या अभिनयातून व्यक्तिमत्त्व विकास या कार्यशाळांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा स्वतंत्र वार्षिक अभ्यासक्रम आहे. बहुतेक शिबिरे ही सुटीकालीन असतात. ‘प्रारंभ’चे वर्ग त्याला अपवाद आहेत. दर शनिवारी संध्याकाळी बाराही महिने हे वर्ग सुरू असतात. वर्षांतून एकदा मे महिन्यात शिबिरार्थीचा सहभाग असलेली बालनाटय़े सादर केली जातात. जानेवारी महिन्यात ‘प्रारंभ’च्या वतीने भरविल्या जाणाऱ्या बाल महोत्सवातही ही बालनाटय़े सादर केली जातात. अशा रीतीने प्रशिक्षण वर्गात गिरविलेले अभिनय धडे प्रत्यक्ष सादरीकरण करून अजमाविण्याची संधी मुला-मुलींना मिळते. एरवी एखादे शिबीर लोकप्रिय झाले, की शिबिरार्थीची संख्या वाढते. मग सकाळ-दुपारचे स्वतंत्र वर्गही घेतले जातात. अशा वाहत्या गंगेत हात धुऊन घेत खोगीरभरतीद्वारे खोऱ्याने पैसा ओढण्याकडे काही शिबीर संचालकांचा कल असतो. ‘प्रारंभ’ने सुरुवातीपासूनच हा मोह टाळला आहे. अभिनयाच्या या वार्षिक प्रशिक्षण कार्यशाळेत फक्त ३० मुला-मुलींनाच प्रवेश दिला जातो. अजूनही हा दंडक पाळला जातो.
सकस बालनाटय़ांची भेट     
‘प्रारंभ’ने अतिशय जाणीवपूर्वक परिकथा, जादू, शापित राजकन्या, शूर राजपुत्र आणि राक्षसांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या बालनाटय़ांना बाहेर काढले. अतिशय वेगळी, आताच्या मुलांना भावणारी, त्यांना विचार करायला लावणारी बालनाटय़े ‘प्रारंभ’ने सादर केली. गेल्या १४ वर्षांत या संस्थेने कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुला-मुलींचा सहभाग असलेली तब्बल ३५ नाटके सादर केली. त्यातून शेकडो मुला-मुलींनी भाग घेतला. पाण्याला लागली तहान, ध्यानयोगी स्वामी विवेकानंद, मदर्स-डे, नक्षत्रांचे रान, स्वप्नातली बाग फुलांची, विंदा करंदीकरांच्या कवितांवर आधारित ठोंब्या ठोंबीची गोष्ट, सण येती घरा आदी विविध विषयांवरची सकस बालनाटय़े ही प्रारंभच्या कार्यशाळेची फलश्रुती ठरली. प्रारंभच्या कार्यशाळेतून आतापर्यंत शेकडो मुला-मुलींनी भाग घेतला. त्यातील सर्वच काही अभिनेते बनले नाहीत. मात्र रंगमंचावर शेकडो रसिकांसमोर अभिनय सादर करण्याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला. चारचौघांमध्ये मिसळण्याची, समूह वृत्तीने काम करण्याची त्यांना सवय लागली. शुभम शर्मा, सध्या लोकप्रिय असलेल्या कन्यादान मालिकेतील रुचिका पाटील, तेजस रहाटे आदी तरुण कलावंतांनी त्यांच्या अभिनयाचे प्राथमिक धडे ‘प्रारंभ’च्या प्रशिक्षण वर्गातूनच गिरविले.
महिलांसाठीही प्रशिक्षण वर्ग
गृहिणींच्या मागणीवरून अरुंधती भालेराव यांनी महिलांसाठीही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शालेय-महाविद्यालयीन जीवनात कधी तरी रंगभूमीची पायरी चढलेल्या महिलांना पुन्हा अभिनय करण्याची संधी मिळाली. ३० ते ७० वयोमान असलेल्या महिला हिरिरीने या प्रशिक्षण वर्गात सहभागी होतात, नाटकात भूमिका करतात. २००८ पासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रिंगा रिंगा रिंगा, आठवणींच्या गंधकोषी, आम्ही ३३ टक्के-भाग १, आम्ही ३३ टक्के-भाग २, ये गं ये गं सरी, मृत्यूर्मा, पाहुणा येता मंडळात, गुंफण आदी शंभर टक्के हौशी महिला अभिनेत्रींचा सहभाग असलेली नाटके ‘प्रांरभ..’च्या वतीने सादर करण्यात आली. महाराष्ट्रात महिला मंडळांमध्येही या नाटकांचे प्रयोग झाले.
महिला आणि बाल महोत्सव
तीन वर्षांपासून ‘प्रारंभ’च्या वतीने ठाण्यात जानेवारी महिन्यात बाल महोत्सव, तर ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये महिला महोत्सव आयोजित केला जात आहे. महिला महोत्सवात कर्तृत्ववान महिलांचा सौदामिनी पुरस्कार देऊन गौरव केला जातो. दोन्ही महोत्सवांत विविध प्रकारचे खेळ, स्पर्धा, नाटके, जादूचे प्रयोग तसेच खाद्यजत्रा असतात.    
इतर उपक्रम
काही शिक्षकांच्या मागणीवरून ‘प्रारंभ’ने शिक्षकांसाठीही अभिनय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यास सुरुवात केली. मुलांसाठी बसविलेली नाटकेच त्यांच्याकडून सादर करण्यात येतात. अभिनय कार्यशाळांव्यतिरिक्त  ‘प्रारंभ..’च्या वतीने प्रत्येकी तीन महिने कालावधीच्या निवेदन आणि कथाकथन कार्यशाळा आयोजित केल्या जातात. गेली काही वर्षे कमल भालेराव स्मृती ठाणे जिल्हास्तरीय नाटय़छटा सादरीकरण स्पर्धाही ‘प्रारंभ..’तर्फे घेतली जाते. अभिनय कार्यशाळेत मार्गदर्शन करीत असतानाच आपले या विषयातले ज्ञान अद्ययावत राहील, याची काळजीही अरुंधती भालेराव कटाक्षाने घेत असतात. महाराष्ट्रातील बाल रंगभूमीवर नेमके काय सुरू आहे, यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. ‘महाराष्ट्रातील बालरंगभूमी- एक तौलनिक अभ्यास’ या विषयावर त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला नागपूर विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली आहे. ‘प्रारंभ’च्या वाटचालीत डॉ. आनंद नाडकर्णी, सिद्धकला अ‍ॅकॅडमीचे डॉ. किशोर भिसे, रवींद्र प्रभुदेसाई, मेधा मेहेंदळे, श्वेता बाऊसकर, वैशाली कुलकर्णी, कीर्ती केरकर, वनिता थोरात, मनीषा आचार्य, मनीषा शितूत आदींचे सहकार्य लाभले. त्यांच्यामुळेच संस्थेचे विविध उपक्रम यशस्वी होऊ शकले, असे अरुंधती भालेराव यांनी सांगितले.