भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपांमध्ये देशभक्तीपर देखावे उभारावेत. देशभक्तीवर गीते लावावीत. आणि सुरक्षेचा उपाय म्हणून गणपती मंडपात चारही बाजुने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी सूचना कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी गुरुवारी शांतता समितीच्या बैठकी दरम्यान केली.

हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीत १६ लाखाच्या ऐवजाची चोरी

येत्या बुधवार पासून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. कोणाच्याही भावना दुखावतील असे देखावे गणेशोत्सव मंडळांनी उभारू नयेत. याऊलट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशभक्तीभर आकर्षक देखावे मंडळांनी उभारावेत. सुरक्षेचा उपाय म्हणून गणपती मंडप भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. मंडपा भोवती कार्यकर्ते भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी तैनात ठेवावेत. दर्शनासाठी गर्दी होणार असेल तर तसे नियोजन मंडळांनी करावे, अशा सूचना उपायुक्त गुंजाळ यांनी दिल्या.

हेही वाचा – “आगामी निवडणुकीत आनंद दिघे चमत्कार दाखवतील आणि…”, खासदार राजन विचारेंचा शिंदे गटाला सूचक इशारा

गणपतींचे आगमन, विसर्जन स्थळे, विसर्जन मिरवणुका आणि विसर्जन स्थळांवरील नियोजन याविषयीची माहिती बैठकीत देण्यात आली. गणेशोत्सव काळात जी नियमावली तयार करण्यात आली आहे, त्याचे पालन प्रत्येक मंडळाने करावे. गणपती मंडपात जे सीसीटीव्ही कॅमेरे मंडळांकडून बसविण्यात येतील. त्यामधील एक कॅमेरा समाज कार्यासाठी म्हणून वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर बसवावा, असे आवाहन उपायुक्त गुंजाळ यांनी केले.
गणपतीपूर्वी पालिका हद्दीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना पोलिसांकडून पालिका अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने पालिकेने शहरातील खड्डे भरणीची कामे सुरू केली आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
या बैठकीला कल्याण विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे उपस्थित होते.