एकीकडे हाजीमलंग, टावळीचा डोंगर, दुसरीकडे जावसई आणि खुंटवलीचे नव्याने विकसित होणारे जंगल, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील इतर वनसंपदा, उल्हास नदीचा किनारा, मुबलक पाणीसाठा आणि शांत वातावरण अशी काहीशी ओळख असलेली ही शहरे गेली काही वर्षे विकासाच्या नादात भरकटली आहेत. औद्योगिकीकरणामुळे आलेल्या प्रदूषणामुळे येथील निसर्गसंपदा आणि पर्यावरणच धोक्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळची निसर्गश्रीमंत अंबरनाथ आणि बदलापूर शहरे सध्या येथील प्रदूषणामुळे वाताहतीच्या उंबरठय़ावर असल्याची परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांतील विविध अहवाल, न्यायालयात गेलेली प्रदूषणासंबंधातील प्रकरणे आणि दिवसेंदिवस प्रदूषण करणाऱ्या वाढत्या घटना यांमुळे यावर शिक्कामोर्तब होत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांची एकत्रित लोकसंख्या सहा लाखांच्या घरात आहे. मुंबई-ठाण्याच्या तुलनेत किफायतशीर किमतीत घरे उपलब्ध असल्याने या दोन्ही शहरांची लोकसंख्या येत्या पाच-दहा वर्षांत आणखी झपाटय़ाने वाढणार हे निश्चित आहे. लोकसंख्या वाढीमुळे येथील निसर्गसंपदेवर आक्रमण होत आहे. अंबरनाथ शहराच्या वेशीबाहेर हाजीमलंग पट्टय़ात आणि बदलापूर शहराच्या टावळी डोंगररांगांच्या कुशीतही आता डोंगर फोडण्याचे काम जोरात सुरू आहे. पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील भागातही विकासाच्या नावाने ही अक्षम्य लुडबुड सुरू आहे. त्याचे दुष्परिणाम शहरवासीयांना भोगावे लागणार आहेत. पुन्हा इतक्या लोकसंख्येसाठी आवश्यक पुरेशा पायाभूत सुविधाही शहरात नाहीत. रस्त्यांची लांबी, रेल्वे स्थानकाची क्षमता, पाणीपुरवठा अशा विविध घटकांवर त्यांचा परिणाम जाणवतो आहे. विकासकामे मंदावल्याने प्रदूषणात भर पडते आहे. एकेकाळी शुद्ध हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बदलापूरची हवा दूषित झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातूनच हे स्पष्ट झाले. घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची अकार्यक्षमताही जलप्रदूषणास मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत ठरली आहे. उल्हास नदी, वालधुनी नदी यांच्या प्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा मोठा भरुदड सोसावा लागणार होता. मात्र प्रधान सचिवांच्या हमीपत्रानंतर कारवाई टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र त्याचा धडा काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेला दिसत नाही. आजही बदलापूरची भुयारी गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. जोडण्या अपूर्ण राहिल्याने पाणी थेट उल्हास नदीत सोडले जात आहे. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या वालधुनी नदीचीही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे येथेही नैसर्गिक संपदेची वाताहतच पाहायला मिळते आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution damage nature and environment of badlapur ambernath city
First published on: 11-07-2017 at 01:52 IST