डोंबिवली – ऐन सणासुदीच्या काळात डोंबिवली पूर्व, पश्चिमतेतील बहुतांशी मुख्य वर्दळीचे रस्ते सिमेंट काँक्रीट कामांसाठी खोदून ठेवण्यात आले आहेत. हे रस्ते खोदताना कोणताही पूर्वसूचना किंवा फलक मुख्य रस्त्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी लावला जात नाही. त्यामुळे या खोदकामांमुळे रस्तोरस्ती वाहन कोंडी असे चित्र डोंंबिवलीत आहे.

सिमेंट काँक्रीट रस्ते कामांसाठी आलेला निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करायचा आहे. ही कामे वेळेत पूर्ण केले नाहीतर पुढील निधी मिळणे अशक्य होणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यानंतरची राजकीय परिस्थिती काय असेल हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे शिंदे सरकारच्या काळात डोंबिवलीतील सिमेंट काँक्रीट रस्ते कामांसाठी मिळालेला निधी या सरकारच्या कालावधी खर्च करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

हेही वाचा >>>लोकलमध्ये विसरलेली विवाहाची खरेदीची पिशवी अमेरिकन नागरिकाला परत

डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीसाठी शासनाकडून मंजूर करून आणलेली ३७६ कोटी, अलीकडे आणलेली ५५ कोटीची रस्ते कामे आता शहरात सुरू आहेत. खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी ३५० कोटीहून अधिक रकमेची रस्ते कामे शहरात मंजूर करून आणली आहेत. अशी दोन्ही प्रकारची कामे एकाचवेळी डोंबिवलीत सुरू आहेत. ही कामे एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम यांच्या ठेकेदारांकडून सुरू आहेत.

ही रस्ते कामे आहे त्या परिस्थितीत पूर्ण करण्याचा सपाटा ठेकेदारांनी लावला आहे. या जलदगती कामांमुळे जागोजागी रस्ते खोदकाम करण्यात आल्याने डोंबिवलीकरांना फेरफटका घेऊन इच्छित स्थळी जावे लागते. रस्ते कामे सुरू असलेल्या सोसायटीतील रहिवाशांना आपली वाहने सोसायटी बाहेर काढणे अवघड झाले आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्याचे खोदकाम केल्याने प्रवाशांमध्ये संताप

डोंबिवली पूर्वेतील सावरकर रस्ता, शिवमंदिर स्मशानभूमी रस्ता, चार रस्त्याचे डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्त्याकडे जाणारा भाग काँक्रीट रस्त्यांसाठी खोदण्यात आला आहे. पश्चिमेतील श्रीधर म्हात्रे चौक ते गरीबाचापाडा अनमोलनगरी रस्ता, नवापाड्यातील भोईर जीमखाना भागातील रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. वाहन चालकांना पर्यायी रस्ते शोधत जावे लागते. या रस्त्यावर ट्रक, अवजड वाहन आले की वाहन कोंडी होते.

दिवाळा सणापूर्वी हे रस्ते सुस्थितीत करून घेण्याची मागणी डोंबिवलीकरांनी प्रशासनाकडे केली आहे. डोंबिवलीत एकूण सुमारे ६८ हून अधिक रस्ते कामे प्रस्तावित आहेत. श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास पालिकेकडून टाळाटाळ केली जात असल्याने या रस्त्याच्या ठेकेदाराने काम बंद ठेवले आहे. पालिका आणि ठेकेदाराच्या वादात प्रवाशांना या भागातील अरूंद रस्त्यावरून जावे लागते. रिक्षा चालक मालक संघटनेने हे काम रुंदीकरण करून लवकर सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या रस्ते मार्गातील अतिक्रमणधारकांना स्वताहून अतिक्रमणे काढण्याचे कळविले आहे, असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.