दोन आठवड्यांपूर्वी उल्हासनगरमध्ये नंदकुमार ननावरे यांनी त्यांच्या पत्नीसह बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणात नुकतीच पोविसांनी चार जणांना अटकही केली आहे. मात्र, अद्याप पोलीस तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा दावा करत ननावरे यांच्या बंधूंनी आपलं बोट कापल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला. या प्रकाराची सध्या चर्चा असून त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे प्रकरण?

नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्ट रोजी त्यांच्या पत्नीसह बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. ननावरे हे पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे माजी स्वीय सहाय्यक होते. या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली. आत्महत्येपूर्वी ननावरेंनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यात काहींची नावंही घेतली. त्याआधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दर आठवड्याला एक अवयव कापण्याचा इशारा!

दरम्यान, ननावरे यांच्या भावाने पोलीस योग्य प्रकारे तपास करत नसल्याचा आरोप करून चक्क एक बोट छाटलं आहे. त्यांचे भाऊ धनंजय ननावरे यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत दर आठवड्याला एक अवयव कापणार असल्याचा इशारा दिला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराचा व्हिडीओही त्यांनी रेकॉर्ड केला. या घटनेनंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातून असे प्रकार न करण्याचं आवाहन धनंजय ननावरेंना करण्यात आलं आहे.

“हे भयानक आहे! बाबांनो, स्वत:चं बोट तोडू नका”; रोहित पवारांनी केलं आवाहन, नेमकं प्रकरण काय?

“सरकारमधले दोन मंत्री सामील”

दरम्यान, या प्रकरणात सरकारमधलेच दोन मंत्री सामील असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. “या प्रकरणात शिंदे सरकारमधले दोन मंत्री सामील आहेत. एक मुंबईतले मंत्री आहेत. एक सातारा व फलटण भागातले आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. ननावरेंच्या आत्महत्येला प्रवृत्त करणारे दोन मंत्री आहेत. त्या उद्वेगाने त्यांच्या भावाने आपलं बोट छाटून गृहमंत्र्यांना पाठवलंय”, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत मुंबईतून निवडणूक लढवणार? पत्रकारांनी विचारताच म्हणाले, “ईशान्य मुंबईतून…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे इतकं विदारक चित्र आहे. तरी या राज्याच्या गृहमंत्र्यांना वेदना होत नसतील, तर या राज्याचं ते दुर्दैवं आहे. आत्ता काही लोकांना अटक केली आहे. पण त्यातले मुख्य आरोपी हे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आहेत. आता आमच्यावर लहान-सहान गोष्टींमध्ये खोटे आरोप करणारे कुठे आहेत? या प्रकरणात सत्य समोर यायला हवं”, असंही राऊतांनी यावेळी नमूद केलं.