अत्रे रंगमंदिर खुले झाल्यानंतरच सावित्रीबाई फुले नाटय़गृहाची डागडुजी
ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या शहरांतील महत्त्वाची नाटय़गृहे एकाच वेळी डागडुजीसाठी बंद करण्यात आल्याने नाटय़रसिकांची होणारी परवड आता थांबण्याची चिन्हे आहेत. कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरातील डागडुजीची कामे पूर्ण झाल्यानंतरच डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहाची दुरुस्ती हाती घेण्यात येतील, अशी भूमिका महापौर राजेंद्र देवळेकर यांनी घेतली आहे. त्यामुळे येत्या मार्चपर्यंत सावित्रीबाई फुले नाटय़गृहात नाटकांचे खेळ सुरूच राहणार आहेत.
डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात वारंवार होणारे तारखांचे घोळ आणि येथील अस्वच्छता यामुळे यापूर्वीच वादात सापडले आहे. कल्याण येथील अत्रे नाटय़गृह दुरुस्ती निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरातील काशीनाथ घाणेकर नाटय़गृहाचे लहान सभागृह याच कारणामुळे बंद ठेवण्यात आले आहे. नाटय़गृहांना दुरुस्तीचे वेध लागले असताना डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहाचे काम तातडीने सुरू करू नये, अशी मागणी निर्माता संघ तसेच रसिकांची होती. यासंबंधी चर्चा करण्यासाठी निर्माता संघ अध्यक्ष आणि कल्याण- डोंबिवली पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांची नुकतीच भेट झाली. यावेळी कल्याण येथील बंद असलेले आचार्य अत्रे नाटय़गृहाची डागडुजी करून मार्चपर्यंत चालू करावे आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले नाटय़गृह बंद करावे अशी मागणी निर्माता संघाने महापौरांकडे केली आहे. ही मागणी महापौरांनी मान्य केली असून निदान मार्चपर्यंत तरी सावित्रीबाई नाटय़गृह खुले राहणार आहे.
तारखांचा घोळही टाळणार
तारखांचा घोळ होऊ नये यासाठी ऑनलाइन पद्धतीने तारखा देण्यात याव्यात असा प्रस्ताव महापालिकेतर्फे मांडण्यात आला होता. त्याऐवजी नाटय़गृहे सुव्यवस्थित ठेवा, अशी मागणी निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केली. यावर विचार केला जाईल आणि ऑनलाइन तारखा देण्यावरही पुन्हा विचार करू, असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले. नाटय़गृह प्रयोगांना प्राधान्याने द्यावे आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी दुपारच्या प्रयोगांचे तिकीट वाढवावे, अशी मागणीही कांबळी यांनी यावेळी केली.