ठाणे : महापालिका क्षेत्रात योग्यप्रकारे नालेसफाई करण्याबरोबरच सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे दावे पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. मात्र, गुरुवारी तासभर झालेल्या मुसळधार पावसाने पालिकेचे सज्जता आणि नालेसफाईचे दावे फोल ठरवले. शहरातील अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचले होते. पालिका मुख्यालय परिसरातील नालाही तुंबला होता. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे गेले तीन महिन्यांपासून सातत्याने शहराचा दौरा करून विकासकामांचा आढावा घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पावसाळय़ापूर्वीची तसेच इतर कामांवर लक्ष केंद्रित करत ती पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केला होता. स्वच्छता, सुशोभीकरण, नाल्याच्या प्रवाहात अडथळे ठरणारी नागमोडी वळणे सरळ करणे, उद्यान, शाळा दुरुस्ती, तलावांचे थीमवर सुशोभीकरण करणे, पाणी तुंबणाऱ्या सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच २१ ठिकाणी पंप बसविणे अशी कामे करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. याशिवाय, सिडको भागात रेल्वे पुलाखाली खाडी भरतीच्या वेळेत पाणी साचू नये यासाठीही बटरफ्लाय वॉल बसविण्याची उपाययोजना करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, गुरुवारी तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने पालिकेचे दावे फोल ठरले आहेत. ठाणे शहरात गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. दुपारी १२.३० वाजेपर्यंत शहरात ३२.८१ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत शहरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून परिसर जलमय होण्यास सुरुवात झाली. शहरातील तीन पेट्रोल पंप, वंदना सिनेमागृह, राम मारुती रोड, मासुंदा तलाव, घंटाळी रस्ता, स्थानक परिसर, सिडको या सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते. विशेष म्हणजे, महापालिका मुख्यालयातील गटार तुंबून परिसरातही पाणी साचले होते. गटारातील कचरा रस्त्यावर आला होता. शहरात विविध भागात साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली होती. साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागली. मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू झाला असला तरी त्याचा जोर कमी होता. परंतु गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने पालिकेचे दावे फोल ठरले असून त्याचबरोबर नागरिकांची तारंबळ उडाल्याचे दिसून आले. या संदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याशी सातत्याने संपर्क करून त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. वसई-विरारमध्ये पावसाचा जोर वसई : मागील महिनाभरापासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा एकदा गुरुवारी मध्यरात्रीपासूनच दमदार हजेरी लावली आहे. अधूनमधून पावसाचा जोर कमीजास्त राहिल्याने वसई-विरार शहरांतील अनेक ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जून महिना संपत आला तरी हव्या तशा प्रमाणात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पाऊस कधी पडेल, अशा चिंतेत शेतकरी वर्ग होता. मात्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने चांगली सुरुवात केल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने वसई विरारमधील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर व सखल भागांत पाणी साचून राहिल्याचे चित्र दिसून आले आहे. पावसामुळे नालासोपाऱ्यातील तुळींज आचोळे रस्ता चालू वर्षांत पहिल्यांदा पाण्याखाली गेला आहे. या रस्त्यावर एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचले असून याच पाण्यातून नागरिकांना आपली वाट काढावी लागत आहे. अवघ्या पावसाच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. अजूनही पाहिजे तसा पाऊसही झाला नाही, त्यामुळे पुन्हा नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.