ठाणे : भाजप-सेनेचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास विभाग होता. त्यांच्या कार्यकाळातच नगरविकास विभागाने विहंग गार्डन संकुलामध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच महापालिका स्तरावर यासंबंधी निर्णय घ्यावा असेही या विभागाने त्यावेळी निर्देश दिले होते. त्यामुळे फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयांचाही किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांनी अभ्यास करावा, असा टोला लगावत भाजप नेत्यांचे घोटाळे मी येत्या काही दिवसात बाहेर काढेन, असा इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी सूडबुद्धीने छाब्बया विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्टय़ा बेकायदा ठरविले होते. परंतु राज्य सरकारने दंड माफ करून आम्हाला न्याय दिला आहे, असा दावा यावेळी सरनाईक यांनी केला आहे. एक इंचही अनधिकृत बांधकाम केले असेल तर आमदार पदाचा राजीनामा देईन, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. किरीट सोमय्या यांना या प्रकल्पास किती दंड आकारण्यात आला होता हे देखील माहिती नाही. फडणवीस यांच्या कार्यकाळात यासंबंधी नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती आधी सोमय्या यांनी घ्यावी. ठाण्यातील भाजपच्या कोणत्या आमदाराने एसआरए योजनेमध्ये सदनिका घेतली, कोपरी तरण तलावाचे पाणी कोणी चोरले, कोणत्या नगरसेवक निधीतून हे काम झाले, भाजपच्या कोणत्या माजी गटनेत्याने स्थानक परिसरातील सायकल स्थानकांची जागा हडप केली, गटनेत्याने संस्थेच्या माध्यमातून कोणते गैरप्रकार केले हे सगळे मी बाहेर काढणार आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आर.ए.राजीव यांच्यावर आरोपांच्या फैरी झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी नोटिसा काढल्या होत्या. त्या विरोधात भूमिका घेतली. तसेच राजीव यांनी केलेल्या भ्रष्टाचार बाहेर काढला होता. त्यामुळेच त्यांनी माझ्यावर सूडबुद्धीने ही कारवाई केली होती, असे ते म्हणाले. आरक्षित भूखंड आणि तो विकसित करून दिल्यास टीडीआर देण्याची योजना राज्य सरकारने आणली होती. त्यानुसार आरक्षित भूखंडवर शाळेचे बांधकाम करून दिले. परंतु ती शाळा पालिकेने हस्तांतरित करून घेतली नाही. त्यामुळे तांत्रिक दृष्टीने विहंग गार्डनचे बांधकाम बेकायदा ठरविले गेले. जितके चटई क्षेत्र मिळणार होते, तितकेच बांधकाम केले आहे. त्यामुळे इथे एक इंचही बेकायदा बांधकाम नाही. अशाचप्रकारे इतर विकासकांनीही बांधकामे केली आहेत, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी मी कुठेही जाणार नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच भाजपबरोबर जुळवून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांना वर्षभरापुर्वी पत्र पाठविले होते. त्याला वर्षांचा काळ लोटला असल्याने त्यावर बोलणे उचित होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रहिवाशांचा जल्लोष राज्य सरकारने दंड आणि व्याज माफ केल्याबद्दल छाब्बया विहंग गार्डन या गृहसंकुलातील रहिवाशांनी आणि आमदार सरनाईक यांनी जल्लोष साजरा केला. ढोल ताशा आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. रहिवाशांनी सरनाईक यांचा सत्कारही यावेळी केला. ‘लोकसत्ता’ विरोधात पुन्हा दावा छाब्बया विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकामाचा काही जण कॅम्पाकोला म्हणून उल्लेख करीत आहेत. परंतु हे अनधिकृत बांधकाम नाही. यापूर्वी लोकसत्तामध्ये अशी बातमी छापून आली होती. याप्रकरणी त्यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता. तरीही त्यांनी पुन्हा एकदा खोटा अग्रलेख लिहिला आहे, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच याबाबत येत्या ३० दिवसांत त्यांनी माफी मागितली नाही तर, त्याच्यावर पुन्हा दावा दाखल करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.